राज्यातील एकूण ७ हजार ७८२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. थेट सरपंच निवडून देण्याच्या नव्या नियमांनुसार पार पडलेल्या निवडणुकींचा निकाल जाहीर होत असताना, यामध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्ष बाजी मारतात की सत्ताधारी शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार भाजपा आणि शिंदे गटाने या निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्याचे दिसत असून, भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आज ग्रामपंचायतच्या निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपा या आमच्या युतीला दणदणीत विजय मिळालेला आहे. आतापर्यंतचे जे आकडे आलेले आहेत, त्यानुसार ३ हजार २९ एवढ्या ग्रामपंचायती या आमच्या आलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या सगळ्या भागांमध्ये मग तो विदर्भ, मराठवाडा असो की, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असेल सगळीकडे आमची सरशी झालेली आहे. मी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करेन, की या सहा महिन्यांच्या कारभारावर एकप्रकारे ग्रामीण जनतेने पसंती दाखवली आहे.”

हेही वाचा – Gram Panchayat Election Result 2022 Live: भाजपाची जोरदार मुसंडी, ठरला १ नंबरचा पक्ष; नेत्याचं ट्वीट; पाहा निकालाचे प्रत्येक अपडेट

“मी त्यासोबत आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचही अभिनंदन करेन, की त्यांनीही अविरत प्रयत्न करून भाजपाच्या उमेदवारांना विजय मिळवण्यासाठी एक वातावरण तयार केलं. त्यामुळे जे लोक आमच्या सरकारला नावं ठेवत होते, स्वत: बेकायदेशीर असताना आमच्या सरकारला बेकायदेशीर म्हणत होते, त्यांना न्यायालयाने तर सांगितलंच आहे की आमचं सरकार कायदेशीर आहे. पण आज महाराष्ट्राच्या जनतेनेदेखील सांगितलं, की हेच कायदेशीर सरकार आहे आणि ही जनता याच सरकारच्या पाठीशी आहे.”

“म्हणून मी महाराष्ट्राच्या तमाम जनतेचे मनापासून आभार मानतो, की त्यांनी पसंती आम्हाला दिली आणि त्यांना आश्वास्त करू इच्छितो की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपाचं सरकार हे अशाचप्रकारे ग्रामीण जनतेच्या पाठीशी उभा राहील व त्यांच्या आशा, आकांक्षा पूर्ण करेल. मी पुन्हा एकदा आभार मानतो.”

निवडणुकीची आकडेवारी –

निवडणूक झालेल्या एकूण ग्रामपंचायती – ७,६८२.
एकूण सदस्य संख्या- ६५,९१६ (बिनविरोध- १४,०२८).
निवडणूक झालेल्या सरपंचपदांच्या एकूण जागा- ७,६१९ (बिनविरोध सरपंच- ६९९).
६३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी एकही अर्ज आला नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gram panchayat election result 2022 devendra fadnavis reaction on the success of bjp and shinde group msr