नांदेड : बाळासाहेब हयात असते तर ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतली असती. पण कधी त्यांच्या विचारांच्या आधारे चालणाऱ्या पक्षाला काय झाले आहे माहीत नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर परदेशात पाठविलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळास ‘वरात’ म्हणण्यापर्यंत ते गेले आहेत, अशी टीका करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नांदेड येथे ‘शंखनाद’ सभेतून विरोधकांवर हल्ला चढविला.

या सभेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अपारंपरिक ऊर्जामंत्री अतुल सावे, पंकजा मुंडे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार अशोक चव्हाण यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते. ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तान कसा झुकला हे सांगताना अमित शहा म्हणाले, संपूर्ण जगाला भारताने संदेश दिला आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला उत्तर देण्यासाठी २२ मिनिटांत हवाई दलाने नऊ अड्डे उद्ध्वस्त केले. त्यांनी पाठविलेले ड्रोन, क्षेपणास्त्रे हवेतच विरली. केवळ एवढेच नाही तर पंतप्रधानांनी रक्त सांडणाऱ्यांना पाणी मिळणार नाही, असे सुनावत नेहरूंनी केलेला ‘सिंधू जलकरार’ थांबवला, व्यापारी संबंध तोडले. यापुढे जर पाकिस्तान सुधारला नाही तर धडा शिकवू, असे शहा म्हणाले.

‘ऑपरेशन सिंदूर’वरून उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेत अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, ‘अनेक वर्षे मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी होती. पण सत्तेत अनेक वर्षे असणाऱ्या शरद पवार यांनी या अनुषंगाने काही एक केले नाही.’

आरोग्य सुविधांसाठीच्या निधीत घसघशीत वाढ

नागपूर : डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार असताना आरोग्य सुविधांसाठी अर्थसंकल्पात केवळ ३७ हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती. २०१४ नंतर केंद्रात भाजपची सत्ता आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांना उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्या म्हणून त्यात १ लाख ३५ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढ केली. काँग्रेस सरकारच्या तुलनेत ही रक्कम एक लाख कोटींहून अधिक आहे, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी केला.