उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी एक खुले पत्र प्रसिद्ध करून आपण राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यापासून फारकत घेऊन भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय का घेतला? याचे स्पष्टीकरण दिले होते. या पत्रात त्यांनी पंतप्रधान मोदी आणि शाह यांच्या कार्यप्रणालीशी आपली कार्यप्रणाली मिळतीजुळती असल्याचे म्हटले होते. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी टोला लगावला आहे. इकडे असताना काहीही चालत होते, तिकडे असे चालत नाही, तुलना करताना भान ठेवा, असा खोचक सल्ला जयंत पाटील यांनी अजित पवार यांना विधानसभेत बोलताना दिला.

अग्रलेख: दादांचे पत्र!

काय म्हणाले जयंत पाटील?

जयंत पाटील विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत म्हणाले, “अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी पत्र लिहिले. सत्तेमध्ये असल्याशिवाय विकास होत नाही, असे त्यात ते म्हटले. हे खरंय, सत्ता असल्याशिवाय विकास करता येत नाही. पण विकासाला तत्त्वांची झालर असली पाहीजे. विकासाला काही धोरण असलं पाहीजे. पण त्या पत्रात ते म्हणाले, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या सारखी माझी कामाची शैली आहे. आमचे त्याबाबत दुमत नाही. पण दुसऱ्यांची (भाजपाचे) हरकत येऊ शकते. आपली तुलना कुणाशी करायची? याचं भान तिकडं गेल्यावर ठेवण्याची गरज आहे.”

अजित पवारांनी वेगळा निर्णय का घेतला? जनतेला खुलं पत्र लिहित म्हणाले, “मला राजकारणात…”

“..आणि तेव्हापासून पवार कुटुंबीयात दुरावा निर्माण झाला”, बारामतीमध्ये निनावी पत्र व्हायरल; राजेंद्र पवार म्हणाले…

अजित पवार पत्रात काय म्हटले?

“देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली जो विकास होतो आहे, तो मला महत्वाचा वाटला, कणखर नेतृत्व व योग्य निर्णयप्रक्रीया हे त्यांचे गुण मला भावले. माझी आणि त्यांची कार्यप्रणाली मिळतीजुळती आहे, कामावर आमचे जास्त प्रेम आहे, त्यांच्यासमवेत माझ्या भविष्यातील विकासाच्या ज्या योजना आहेत, त्या अधिक प्रभावीपणे प्रत्यक्षात उतरविणे शक्य होईल, असे मला वाटल्याने मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला”, अशी भूमिका अजित पवार यांनी पत्रात मांडली होती.