Sanjay Raut : बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंची हकालपट्टी करा अशी मागणी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने केली आहे. त्यानंतर आता संजय राऊत यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. अशी मागणी करणाऱ्यांच्या जिभा कशा काय झडत नाहीत? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रामदास कदम यांनी नेमकं काय सांगितलं?

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवण्याचा प्रस्ताव शिवसेनेच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. रामदास कदम म्हणाले, “बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या अध्यक्षपदी राहण्याचा उद्धव ठाकरे यांना कोणताही अधिकार नाही. त्यांची हकालपट्टी केली पाहिजे, मला उद्धव ठाकरे यांना विचारायचं आहे की आता तुमचा स्वाभिमान कुठे गेला आहे? तुम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोललात, अमित शाह यांच्यावर टीका केलीत. देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलीत आणि आता त्याच देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही भेटत आहात. तुम्ही तुमचा स्वाभिमान गहाण ठेवला आहे का? देवेंद्र फडणवीसांना भेटताना तुम्हाला लाज वाटत नाही का?”, असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला.

काय म्हणाले संजय राऊत?

एक लक्षात घ्या, ही त्यांची सत्तेची मस्ती आणि माज आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी कुणी गद्दारी केली हे महाराष्ट्र जाणतो. दिल्लीचे बूट चाटणं , महाराष्ट्राला खड्ड्यात घालणाऱ्यांच्या बाजूने उभं राहणं हे मोठं कार्य असेल तर शिंदेंचा गट ते करतो आहे. आम्ही स्वाभिमानाने उभे आहोत. अटलबिहारी वाजपेयी, आडवाणी यांच्याबरोबरचे काय संबंध होते ते यांनी समजून घेतलं पाहिजे. आत्ता जे लोक फडफड करत आहेत पाळलेले पोपट त्यांना काहीही बोलण्याचा अधिकार नाही. त्या सगळ्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेची शकलं करुन महाराष्ट्राचं नुकसान केलं आहे. अमित शाह महाराष्ट्रात आले आणि त्यांनी शरद पवार, उद्धव ठाकरेंवर टीका केली. हे यांना मान्य असेल तर ते महाराष्ट्र द्रोही आहेत. हातात पैसा आणि सत्ता असल्याने यांची मस्ती चालली आहे. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना काढा हे बोलताना यांच्या जिभा झडत कशा नाहीत? हा माझा सवाल आहे.

भास्कर जाधव यांच्या वक्तव्याबाबत काय म्हणाले राऊत?

भास्कर जाधव यांचं वक्तव्य होतं की शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झाली आहे, त्याबाबत काय सांगाल असं विचारलं असता संजय राऊत म्हणाले, भास्कर जाधव काय म्हणाले? ते मला तुमच्याकडून समजलं आहे. मी त्यांच्याशी चर्चा करेन. भास्कर जाधव हे आमचे सहकारी आहेत. आम्ही त्यांच्याशी नक्की चर्चा करुन. पक्ष संघर्षाच्या कठीण काळातून जात असताना आम्ही जबाबदारी आणि संयमाने काम करतो आहोत. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला पटतेच असं नाही असं संजय राऊत म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut answer to eknath shinde over his shivsena demand about uddhav thackeray and balasahabe thackeray memorial committee scj