राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडली आहे. २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतलं सर्वात मोठं बंड केलं. तर अजित पवारांनी २०२३ मध्ये शरद पवारांविरोधात दंड थोपटले. भाजपा बरोबर हे पक्ष सत्तेत सहभागी झाले आहेत. तर दुसरीकडे शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी आहे. अशात शरद पवार यांनी शिवसेना, राष्ट्रवादी यांच्याबाबत एक महत्त्वाचं भाष्य केलं आहे. त्यासाठी त्यांनी संघाचंही उदाहरण दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले शरद पवार?

“भाजपासह जायचं हे आमच्या सगळ्याच सहकाऱ्यांचं म्हणणं होतं. आपण सत्तेत गेलं पाहिजे ही बाब त्यांनी माझ्यापासून लपवून ठेवली नव्हती. मी एक दिवस त्यांचा प्रस्ताव काय आहे तो मागून घेतला, तो प्रस्ताव समजून घेताना आमची चर्चा झाली. प्रत्येकाने भूमिका मांडली पण मी भाजपासह जाण्याची भूमिका स्वीकारली नाही. मी शेवटी त्यांना सांगितलं की तुम्ही भाजपासह जाणार असाल तर जा मी येऊ शकत नाही.” असं शरद पवार म्हणाले, तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप घाबरले आहेत असंही वक्तव्य शरद पवारांनी केलं आहे.

हे पण वाचा- “प्रफुल्ल पटेल म्हणायचे निवडणुकीत आपला पक्ष टिकणार नाही, त्यामुळे…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते २००४ सालीच…”

पंतप्रधान घाबरले आहेत

शरद पवार यांनी म्हटलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या प्रचंड घाबरले आहेत. त्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात सभा घेतल्या. लोकांशी संवाद साधत असताना ते व्यक्तिगत हल्ले करत आहेत. देशासमोरचे प्रश्न बाजूला ठेवून मला भटकती आत्मा म्हणणं आणि राहुल गांधींचा उल्लेख शहजादा असं करणं हे चुकीचं आहे. हे काही निवडणुकीचे प्रश्न नाहीत असं शरद पवारांनी म्हटलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

संघाचं नाव घेत एकनाथ शिंदे आणि अजित पवारांबाबत काय म्हणाले शरद पवार?

भाजपात एक काळ असा होता की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) ची त्यांना गरज होती. पण आता भाजपाने त्यांचा विस्तार मोठ्या प्रमाणावर केला आहे. भाजपा स्वतःचा कारभार स्वतः करण्यासाठी सक्षम आहे हे मी म्हणत नाही तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांनीच म्हटलं आहे. संघ विचारांनी बळकट असलेल्या भाजपाने जर संघाबाबत असं म्हटलं आहे तर मग भविष्यात राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) या दोन पक्षांना ही धोक्याची घंटा आहे. असा इशारा शरद पवार यांनी दिला. ज्या दिवशी भाजपाची गरज संपेल तेव्हा राष्ट्रवादी आणि शिवसेनेबाबतही अशीच भूमिका घेण्याची शक्यता भाजपा घेऊ शकते. असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले? शरद पवारांनी सांगितली ठाऊक नसलेली घडामोड, म्हणाले, “मी त्यावेळी..”

आत्ताचं चित्र वेगळं असेल

पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे चार खासदार आणि काँग्रेसचा एक खासदार आणि एमआयएमचा एक खासदार होता. यावेळी मात्र चित्र वेगळे असणार आहे. प्रत्येकांना यावर्षी उत्तम जागा मिळतील निवडणुकीदरम्यान लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आम्ही घेतल्या त्यावर आम्हाला हे स्पष्ट झाला आहे मागच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी सोबत मुस्लिम संघटन होते. यावर्षी हे मुस्लिम संघटन त्यांच्यासोबत नाही त्यामुळे यावेळी त्यांची ताकद कमी झाली आहे. त्यांच्या मतांचा टक्का यंदा कमी झालेला पाहायला मिळेल असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar gave warning to eknath shinde and ajit pawar takes rss name and bjp scj