Amol Khatal On Balasaheb Thorat : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागला. या निकालात महायुतीला मोठं यश मिळालं, तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. महायुतीला तब्बल २०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या. त्यामुळे आता राज्यात महायुतीचं सरकार लवकरच स्थापन होईल. पण दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष, शिवसेना (ठाकरे) आणि काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. यामध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांचाही संगमनेर मतदारसंघामधून पराभव झाला. त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे अमोल खताळ हे निवडून आले. दरम्यान, बाळासाहेब थोरात यांचा पराभव करत मोठ्या मताधिक्यांनी विजयी झालेले अमोल खताळ यांची राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आज अमोल खताळ यांनी त्यांच्या विजयामागची कारणं काय? याबाबत भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमोल खताळ काय म्हणाले?

“संगमनेरमध्ये मोठी दहशत सुरु होती. त्या दहशतीचा बंदोबस्त करण्यासाठी लोक अनेक दिवसांपासून अपेक्षा ठेवून आमच्याकडे पाहत होते. तसेच महायुतीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामुळे मला यश मिळालं. आता बाहेरच्या लोकांना यावर विश्वास बसत नाही. कारण संगमनेरमध्ये सुसंस्कृत नेते आहेत असं अभासी चित्र निर्माण केलं गेलं होतं. मात्र, मतदारसंघातील जनतेने यावेळी निर्धार केला होता की या निवडणुकीत परिवर्तन करायचं. त्यामुळे बाहेरच्या लोकांसाठी हे अनपेक्षित आहे”, असं अमोल खताळ यांनी म्हटलं.

हेही वाचा : “हे फक्त शब्द नाहीत, तर इशारा आहे”, विधानसभेत हरल्यानंतर अमित ठाकरे पुन्हा सक्रिय; सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत!

“माझी विधानसभा निवडणूक लढवायची म्हणून तयारी नव्हती. पण एका मोठ्या व्यक्ती विरोधात किंवा एका मोठ्या प्रवृत्तीच्या विरोधात आमचा लढा सुरु होता. मात्र, आम्हाला योग जुळून येत नव्हता. पण महायुती सरकारने कितीतरी लोक कल्याणकारी योजना आणल्या त्यामुळे आम्हाला लोकांच्या घरी जावून ते काम लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली. तेव्हा आम्हाला जाणवलं की संगमनेरमध्ये मोठी दहशत आहे. त्यानंतर आम्ही त्यावर काम करायला सुरुवात केली. तसेच लोकांना विश्वास दिला की या ठिकाणी विरोधक देखील सक्षम आहेत. त्या विश्वासाला जनतेने देखील साथ दिली”, असं निवडणुकीच्या यशामागचं कारण अमोल खताळ यांनी सांगितलं.

“खरं तर संगमनेरमध्ये सुरु असलेली दहशत आणि दादागिरी लोकांना आवडेली नाही. वसंत देशमुखांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ धांदरफळमध्ये जी घटना घडली. मात्र, ती घटना घडली नसती तरी देखील आमच्यावर हल्ला करण्याची योजना होती. मात्र, त्या घटनेनंतर जनतेने त्यांची दहशत संपवण्यासाठी पुढाकार घेतला”, असं म्हणत नाव न घेता आमदार अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena mla amol khatal on congress balasaheb thorat sangamner vidhan sabha election result 2024 gkt