मुंबई : हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथेचा संगम असणारा आर. एस. प्रसन्ना दिग्दर्शित व आमिर खान प्रॉडक्शन्स निर्मित ‘सितारे जमीन पर’ हा हिंदी चित्रपट २० जून २०२५ पासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या विशेष स्क्रिनिंगला समाजसेविका आणि लेखिका सुधा मूर्ती उपस्थित होत्या. हा चित्रपट पाहून त्यांनी सर्व कलाकार व तंत्रज्ञांचे कौतुक करीत ‘सितारे जमीन पर’ अनेकांचे डोळे उघडणारा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ‘विशेष मुलांकडून शिकण्यासारख्या खूप तत्त्वज्ञानात्मक गोष्टी आहेत आणि या गोष्टी चित्रपटात अतिशय प्रभावीपणे मांडण्यात आल्या आहेत. या चित्रपटाचा समाजातील नागरिकांवर प्रभाव पडून समाजात मोठा बदल घडु शकतो. तसेच लोकांना संवेदनशील बनवू शकतो. या मुलांकडे सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणेच पाहिले पाहिजे आणि हा दृष्टिकोन समाजात रूजणे महत्त्वाचे आहे’, असे मत सुधा मूर्ती यांनी व्यक्त केले.
मुलांच्याच आयुष्यातील महत्त्वाच्या मुद्यांना स्पर्श करणारा, पालक आणि मुलांमधील संवादाचे महत्त्व पटवून देणाऱ्या ‘तारे जमीन पर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आमिर खानने २००७ साली केले होते. त्यानंतर ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटाची निर्मिती केली. आता तो पुन्हा एकदा लहान मुलांनाच एकत्र घेऊन केलेला ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहे. या चित्रपटाच्या विशेष स्क्रिनिंगला सुधा मूर्ती यांनी हजेरी लावली आणि हा चित्रपट पाहून त्या भारावून गेल्या. आमिर खान प्रोडक्शन्स निर्मित ‘सितारे जमीन पर’ चित्रपटात आरुष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, सम्वित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशिष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर हे १० उदयोन्मुख तारे झळकत आहेत. तर प्रसिद्ध अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचे गीते अमिताभ भट्टाचार्य, संगीत शंकर-एहसान-लॉय आणि पटकथा दिव्य निधी शर्मा यांची आहे.
‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट अनेकांचे डोळे उघडणारा आहे. समाजातील बहुसंख्य नागरिक विशेष मुलांना समजून घेत नाहीत. सामान्य म्हणजे काय ? हाच एक तत्त्वज्ञानात्मक प्रश्न आहे. पण ‘सितारे जमीन पर’ चित्रपटात या मुलांचे जीवन खूप सुंदर पद्धतीने दाखविण्यात आले आहे. ही मुले खूप संवेदनशील आणि निष्कलंक असतात. त्यांच्या जगण्याची पद्धत खूप सोपी असते आणि ते सदैव हसत असतात. एखाद्या व्यक्तीला मिळालेल्या यशात ही मुले आनंद मानतात’, असेही सुधा मूर्ती म्हणाल्या.