राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपा-शिंदे गटाच्या मंत्र्यांवर प्रचंड संतापले. लक्षवेधी मांडण्यासाठी मंत्री वाट पाहत असूनही सरकारचे सहा मंत्री गैरहजर होते, हा मुद्दा उपस्थित करत अजित पवारांनी या मंत्र्यांना जनाची नाही, तर किमान मनाची आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच देवेंद्र फडणवीसांना आम्ही विश्वासू-प्रामाणिक म्हणून पाहतो असं म्हणत टोला लगावला. ते बुधवारी (१५ मार्च) विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित पवार म्हणाले, “आज सभागृहात केवळ मंगलप्रभात लोढांची लक्षवेधी झाली. सहा मंत्री गैरहजर होते. यांना जनाची नाही, तर किमान मनाची काही आहे का? अशाप्रकारचे शब्द वापरताना आम्हालाही वाईट वाटतं. काल रात्री एक-दीड वाजेपर्यंत लोक बसली. सकाळी ज्यांची लक्षवेधी होती ते दोन्हीकडील आमदार आले आणि मंत्रीच उपस्थित नाही. मंत्र्यांना असं काय काम आहे?”

“आम्हाला मंत्री करा म्हणून मागेमागे पळता आणि मंत्री झाल्यावर…”

“या मंत्र्यांना मंत्री करताना मागेमागे पळता. हे मी म्हणत नाही, सकाळी कालीदास कोळंबकरांनी सांगितलं. हे मंत्री होण्यासाठी पुढे-पुढे जातात, आम्हाला मंत्री करा म्हणून सांगतात आणि मंत्री झाल्यावर सभागृहाची परंपरा पाळत नाहीत आणि दिलेलं वैधानिक काम करत नाहीत,” अशी तक्रार अजित पवारांनी केली.

“देवेंद्र फडणवीसांना आम्ही विश्वासू-प्रामाणिक म्हणून पाहतो, पण त्यांचंही…”

अजित पवार पुढे म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांना आम्ही विश्वासू-प्रामाणिक म्हणून पाहतो. त्यांना उच्चविद्याविभूषित अशी नावं दिली आहेत, पण त्यांचंही लक्ष नाही. त्यांनी त्यांच्या काही मंत्र्यांना सांगावं. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री रात्री दोन वाजेपर्यंत काम करतात. त्यामुळे त्यांना सकाळी लवकर येण्याची अडचण आम्ही समजून घेतो. मात्र, चंद्रकांत पाटील रात्री दोन-अडीचपर्यंत जागत नाहीत. त्यांनी सकाळी लवकर उठून आलं पाहिजे. संबंधित ज्यांची लक्षवेधी आहे त्यांनी आलं पाहिजे.”

हेही वाचा : राष्ट्रवादीनेच जुनी पेन्शन बंद केली असं म्हणताच अजित पवार संतापले; शरद पवारांचं नाव घेत म्हणाले, “अरे बाबा…”

“हे अतिशय गलिच्छपणाचं राजकारण सुरू आहे”

“हे अतिशय गलिच्छपणाचं राजकारण सुरू आहे. यांना कुणालाही विधिमंडळाच्या कामकाजात अजिबात रस नाही. यांना इतर कामांमध्येच रस आहे. त्यांनी या कामाला महत्त्व द्यायला हवं. आम्हाला का बोलावं लागतं. मला हे बोलायला बरं वाटतं का. प्रत्येकाने प्रत्येकाचा मानसन्मान राखला पाहिजे. मात्र, निर्लज्जपणाचा कळस झाल्यावर आमचाही नाईलाज होतो. एवढं बोलण्याची कुणावर वेळ येऊ नये. ही पद्धत नाही,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar say we believe that devendra fadnavis is sincere in assembly session pbs