Bandra Railway Station Stampede Sanjay Raut : मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर प्रवाशांची मोठी गर्दी होऊन त्यातून चेंगराचेंगरीची घटना घडली आहे या चेंगराचेंगरीमध्ये ९ प्रवासी जखमी झाले आहेत. तसेच यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. वांद्रे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर आज (रविवार, २७ ऑक्टोबर) पहाटे ५ च्या सुमारास ही घटना घडली. मुंबई-गोरखपूर ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. रेल्वेत चढत असतानाच झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. त्यात नऊ प्रवासी जखमी झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रवाशांनी ट्रेनमध्ये चढण्यासाठी गर्दी केली होती. त्याचदरम्यान काही प्रवासी फलाटावर पडले. त्यापैकी काहीजण इतर प्रवाशांच्या पायाखाली तुडवले गेले. यामध्ये नऊ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या घटनेनंतर विरोधी पक्षांनी थेट रेल्वे मंत्र्यांना लक्ष्य केलं आहे.

हे ही वाचा >> Bandra Terminus : मोठी बातमी! मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरी, ९ प्रवासी जखमी, दोन जणांची प्रकृती गंभीर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “नरेंद्र मोदींचं तिसरं सरकार आल्यापासून देशात गेल्या पाच महिन्यांत २८ मोठे रेल्वे अपघात झाले आहेत. हे लोक (भाजपा सरकार) केवळ बुलेट ट्रेनवर चर्चा करत आहेत, हाय स्पीड ट्रेनच्या गप्पा मारत आहेत. परंतु, जिथे खरंच सुधारणांची आवश्यकता आहे त्यावर बोलायला तयार नाहीत. मुंबई उपनगरीय रेल्वेमध्ये अनेक सुधारणांची आवश्यकता आहे. परंतु, त्यावर हे लोक चर्चा करत नाहीत. सर्वाधिक रेल्वे प्रवासी हे मुंबई व मुंबई उपनगरांत आहेत. उपनगरीय रेल्वेच्या समस्या वर्षानुवर्षे तशाच आहेत. अशा वेळी त्यात सुधारणांची आवश्यकता असताना रेल्वे मंत्रालय त्याकडे ढुंकूनही पाहत नाही”.

हे ही वाचा >> बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण : लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल आरोपींच्या संपर्कात, मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल होण्याची शक्यता

संजय राऊत म्हणाले, “आज रविवार असूनही विविध स्थानकांवर प्रचंड गर्दी होत आहे. वांद्रे स्थानकावर अशीच गर्दी होऊन त्यातून चेंगराचेंगरी सारखी घटना घडली. अनेक लोक त्यात जखमी झाले. परंतु, आपले रेल्वेमंत्री महाशय मात्र बुलेट ट्रेनच्या मस्तीत आहेत. त्यांचे पाय जमिनीवर नाहीत. ते बुलेट ट्रेनच्या मस्तीत देशभर फिरत आहेत. आमचे लोक चेंगरून मरत आहेत. मात्र रेल्वेमंत्र्यांचं त्याच्याशी काहीही घेणंदेणं आहे असं दिसत नाही. आतापर्यंत झालेल्या रेल्वे अपघातांमध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडले. परंतु, लोकांच्या सुरक्षेसाठी नव्या रेल्वेमंत्र्यांनी काय केलं? हायफाय अधिकारी, आयआयटी मधून शिकलेले आयएएस अधिकारी, मोठे उद्योगपती अशी ख्याती असलेले हे रेल्वेमंत्री… यांनी रेल्वेसाठी काही केलं आहे का? काही केलं असेल तर त्यांनी पुढे येऊन सांगावं”.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bandra railway station stampede sanjay raut blames railway minister ashwini vaishnaw for poor management asc