मुंबई : पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे दहशतवादाचे कंबरडे मोडण्याचे काम भारतीय लष्कराने केले आहे. या कामगिरीबद्दल लष्कराचे आभार व्यक्त करणे आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी ‘तिरंगा यात्रे’चे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केले.

महायुतीतर्फे ऑगस्ट क्रांती मैदान येथे बुधवारी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी फडणवीस बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार आदी या वेळी उपस्थित होते. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून जगाला भारताचे लष्करी सामर्थ्य दिसून आले आहे. पाकिस्तानला भारताच्या लष्करी सामर्थ्यापुढे गुढघे टेकावे लागले आहेत. भारताची संरक्षण तयारी आणि सुरक्षा यंत्रणा किती भक्कम आहे, हेही भारताने दाखवून दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पहलगाम येथील क्रूर हल्ल्याचे प्रत्युत्तर भारताने दिल्याचे या वेळी नमूद केले.

तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपस्थितांनी स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन केले. ऑगस्ट क्रांती मैदान येथून सुरू झालेली यात्रा गिरगाव चौपाटी येथील शहीद तुकाराम ओंबळे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून समाप्त करण्यात आली.

ठाण्यात शिवसेनेची ‘तिरंगा रॅली’

ठाणे : पाकिस्तानने भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करू नये, अशाप्रकारेचे शौर्य आपल्या तिन्ही दलाच्या सैन्याने दाखवले आणि त्यांच्या पाठीशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उभे राहिले, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ठाण्यात तिरंगा रॅलीदरम्यान बोलताना व्यक्त केले. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वच स्तरातून भारतीय लष्करावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यामुळे सर्व शूरवीर सैनिकांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेतर्फे बुधवारी ठाण्यात ‘तिरंगा रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. शासकीय विश्रामगृह येथून ही रॅली सुरू झाली. या रॅलीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार नरेश म्हस्के, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तसेच इतर नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पहलगाम हल्ल्यानंतर दहशवाद्यांना जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता. लष्कराने दिलेल्या प्रत्युुत्तरानंतर दोनच दिवसांत पाकिस्तानची काय असवस्था झाली, हे संपूर्ण देशाने पाहिले. यामुळेच तिन्ही सैन्य दलाचे अभिनंदन करण्याबरोबर त्यांच्या पाठिशी देश खंबीरपणे उभे असल्याचे दाखवून देण्यासाठी ही रॅली काढण्यात आली.

एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री