Maharashtra Rain Updates मुंबई : मुंबईसह इतर भागात पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. ठिकठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक भागात वाहतूक कोंडी झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने सुधारीत अंदाज जाहीर केला असून त्यानुसार हवामान विभागाने मुंबईसह ठाणे पालघर जिल्ह्याला आज अतिवृष्टीचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे.

संपूर्ण राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. मुंबईतही मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. शहर तसेच उपनगरात रविवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून हवामान विभागाने जाहीर केलेल्या सुधारित अंदाजानुसार आज मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

दिवसभरात मुंबईत पावसाचा जोर वाढणार असून काही भागात कमी वेळात अधिक पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पाणी साचून वाहतूक सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पावसाचा जोर पहाटेपासून असल्याने सकाळी कार्यालय गाठण्यासाठी नोकरदार वर्गाला कसरत करावी लागली. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली होती. त्यामुळे अनेकांनी साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत कार्यालय गाठले.

मुंबईची आत्तापर्यंत स्थिती काय?

शहर तसेच उपनगरात रविवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोर धरल्यामुळे सकाळी ८ ते ९ पर्यंत अनेक भागात पाणी साचले होते. त्यामुळे नोकरदार वर्गाची तारांबळ झाली. अचानक पाऊस वाढल्यामुळे पालकांचाही गोंधळ उडाला. शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांना घरी आणण्यासाठी पालकांची धावपळ सुरू होती.

राज्याची स्थिती

मुंबई बरोबरच आज रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातही अतिवृष्टीचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे. त्यानुसार या भागातही जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडत आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा, माणगाव, पनवेल भागात पावसाचा जोर सर्वाधिक आहे.

दोन कमी दाब क्षेत्र पोषक

उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगत नवीन कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. याची तीव्रता वाढून, मंगळवारी ही प्रणाली जमिनीवर येण्याची शक्यता आहे. याचबरोबर विदर्भ आणि परिसरावर आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले असून, त्याला लागून समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. ही प्रणाली पश्चिमेकडे सरकून आज गुजरातकडे जाण्याची शक्यता आहे. या दोन्ही प्रणाली राज्यात पाऊस वाढविण्यास पोषक ठरणार आहेत.