मुंबई : आपत्ती आणि पुनर्वसन विभागाने अतिवृष्टी आणि महापूर बाधित शेतकऱ्यांसाठी शुक्रवारी २,५४० कोटी ९० लाख ७९ हजार रुपयांचा निधी वितरणास मंजुरी दिली. या मदतीसह बाधित शेतकऱ्यांना ११,५९३ कोटी ९४ लाख ८१ रुपयांच्या निधी वितरणाला मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी दिली.
निधी वितरणाचे शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार खरीप हंगामात अतिवृष्टी, पूर या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामात बियाणे व अनुषंगिक बाबींची खरेदी करण्यासाठी मदत व्हावी यासाठी राज्य शासनाने विशेष मदती अंतर्गत प्रती हेक्टरी १० हजार रुपये प्रमाणे (तीन हेक्टर मर्यादेत) १,७६५ कोटी २२ लाख ९२ हजार इतका निधी वितरित करण्यास ही मान्यता दिली आहे. पुणे, नाशिक व अमरावती विभागीय आयुक्तांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार ही मदत देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
त्यासह सातारा जिल्ह्यातील १४ हजार ६४३ शेतकऱ्यांच्या ५ हजार ८०३.५५ हेक्टर क्षेत्रातील नुकसानीपोटी ५ कोटी ८० लाख ३६ हजार रुपये. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील १६ लाख ५९ हजार २९३ शेतकऱ्यांच्या १२ लाख ११ हजार ५९४ हेक्टर क्षेत्रातील नुकसानीपोटी १२११ कोटी ५४ लाख ९० हजार रुपये. अमरावती जिल्ह्यातील ४ लाख ९० हजार ९११ शेतकऱ्यांच्या ५ लाख ४७ हजार ८७६.६५ हेक्टर क्षेत्रातील नुकसानीपोटी ५४७ कोटी ८७ लाख ६६ हजार रुपयांच्या निधी वितरणास मान्यता दिली आहे.
जून ते सप्टेंबर २०२५ कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे विभागातील जिल्ह्यांत बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दोन ते तीन हेक्टर मर्यादित (वाढीव एक हेक्टरसाठी) १२० कोटी ३३ लाख ८७ हजाराची मदत वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यातील २१ हजार ३९२ शेतकऱ्यांच्या १५ हजार ५१२.११ हेक्टरवरील बाधित क्षेत्रासाठी १३ कोटी २० लाख ३८ हजार रुपये वितरित केले जाणार आहेत.
अमरावती बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ जिल्ह्यांतील ८६ हजार ५८२ शेतकऱ्यांच्या ७१ हजार ३३३.९० हेक्टरवरील बाधित क्षेत्रासाठी ६१ कोटी ८१ लाख ६४ हजार रुपये वितरित करण्यात येतील. धाराशिव जिल्ह्यातील ६३ हजार ४१४ शेतकऱ्यांच्या ४३ हजार १६२.३१ हेक्टरवरील बाधित क्षेत्रासाठी ४२ कोटी ४५ लाख ९३ हजार रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे. सोलापूर जिल्ह्यातील २ हजार ८९६ शेतकऱ्यांच्या २ हजार ५५९.६४ हेक्टरवरील बाधित क्षेत्रासाठी २ कोटी ८५ लाख ९२ हजार रुपये वितरित करण्यात येतील.
जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी अमरावती जिल्ह्यासाठी ५७० कोटी ९ लाख ८७ हजार, यवतमाळ, वाशिम, सोलापूर जिल्ह्यांतील बाधित क्षेत्रासाठी ८५ कोटी २४ लाख १३ हजार, अशी एकूण ६५५ कोटी ३४ लाखांची मदत वितरित करण्यात येईल. अमरावती जिल्ह्यात २ हेक्टर मर्यादेसाठी ४ लाख ९० हजार ९११ शेतकऱ्यांच्या ४ लाख ८१ हजार ५०३.६५ हेक्टर क्षेत्रासाठी ४९० कोटी ४२ लाख ५२ हजार आणि दोन ते तीन हेक्टर मर्यादेत ५५ हजार २१२ शेतकऱ्यांच्या ६६ हजार ३७३ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ७९ कोटी ६७ लाख ३५ हजार रुपये वितरित करण्यात येतील.
यवतमाळ जिल्ह्यातील ३३ हजार ४८७ शेतकऱ्यांच्या ३८ हजार ९९३.४८ (दोन हेक्टर मर्यादेत) हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ३३ कोटी १४ लाख ४६ हजार रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यातील ३८ हजार ७३४ शेतकऱ्यांच्या ४२ हजार १८७.५६ (दोन हेक्टर मर्यादेत) हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ३६ कोटी ४० लाख ४४ हजार रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील १४ हजार ७९८ शेतकऱ्यांच्या १४ हजार ९०७.१५ (दोन हेक्टर मर्यादेत) हेक्टर बाधित क्षेत्रासाठी १५ कोटी ६९ लाख २३ हजार रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
