मुंबई : यंदा मोसमी पाऊस जोरदार बरसणार असून त्याची चुणूक पहिल्याच दिवशी मिळाली आहे. यंदा राज्यात जून महिन्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०६ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रामुख्याने मराठवाड्यात सर्वाधिक म्हणजे सरासरीच्या ११२ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याचबरोबर मध्य महाराष्ट्रात ११० टक्के, कोकणात १०७ टक्के आणि विदर्भात १०९ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
नैऋत्य मोसमी पावसाचा सुधारित अंदाज मंगळवारी हवामान विभागाचे महासंचालक मृत्यंजय मोहपात्रा यांनी जाहीर केला. यंदा देशात १०८ टक्के पाऊस पडणार आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, बिहार, ओडिशा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश येथे सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
मोसमी पावसाच्या कालावधीतील पावसाच्या अंदाजित टक्केवारीत वाढ केली आहे. एप्रिल महिन्यात जाहीर केलेल्या अंदाजामध्ये १०५ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. सुधारित अंदाजात हवमान विभागाने जून ते सप्टेंबर या मोसमी पावसाच्या हंगामात १०६ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यंदाच्या मोसमी पावसाच्या हंगामात मध्य भारत आणि दक्षिण भारतात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. मध्य भारत आणि दक्षिण भारतात सरासरीच्या १०६ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, ओडिशा या भागांत १०६ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, पूर्व मध्य भारतातील राज्यांत मोसमी पावसाच्या हंगामात सरासरी पावसाचा अंदाज आहे. राजस्थान, पंजाब, उत्तराखंड, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात यंदा सरासरी पावसाचा अंदाज आहे. या राज्यांत सरासरीच्या ९२ ते १०८ टक्क्यांदरम्यान पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच ईशान्य भारतातील राज्यांमध्ये यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. मिझोराम, आसाम, बिहार, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मनिपूर आणि नागालॅंड या राज्यांमध्ये सरासरीच्या ९४ टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
राज्यात चांगला पाऊस
मोसमी पावसाच्या संपूर्ण हंगामात म्हणजेच जून ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात सरासरीपेक्षा १०६ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्याचबरोबर जून महिन्यातही राज्यात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. जून महिन्यात राज्यातील अनेक भागांत सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. काही भागात सरासरी पाऊस राहील असा अंदाज मंगळवारी हवामान विभागाने व्यक्त केला. तसेच मोसमी पावसाच्या काळात एल निनो सक्रिय होण्याची स्थिती नसल्यानेही यंदा चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज
राज्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील काही भागात बुधवारीही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यात मुंबई, ठाणे भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि नागपूर भगात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहतील तसेच काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. या तुलनेत पालघर, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव या परिसरात हलक्या सरींचा अंदाज हवामान विभगाने व्यक्त केला आहे.
मंगळवारी सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत झालेला पाऊस
ठाणे- ३० मिमी
बीड- ३५.८ मिमी
अलिबाग- २०.६ मिमी
सोलापूर- १२.४ मिमी
पुणे-१५.७ मिमी
सांताक्रूझ- १.२ मिमी
कुलाबा- १६.६ मिमी
रत्नागिरी- २२.८ मिमी
कोल्हापूर- १४ मिमी
भारत फॉरकास्टिंग सिस्टमचे अनावरण
गावपातळीपर्यंत हवामान अंदाज अधिक जलद देण्यासाठी भारत सरकारने मंगळवारी रोजी भारत फॉरकास्टिंग सिस्टमचे (बीएसएफ) अनावरण केले. हे ६ किमीच्या ग्रिडवर चालणारे जगातील सर्वात अचूक चालणारे हवामान प्रारुप आहे. केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी मंगळवारी विज्ञान भवन येथे बीएसएफचे अनावरण केले. दरम्यान, या नवीन हवामान प्रारुपामुळे हवामान पद्धतीचा अंदाज लावण्याच्या भारताच्या क्षमतेला चालना मिळणार आहे.