मुंबई: नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचे आणि कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेतील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक टप्पा २ अ चे लोकार्पण केव्हा होणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. असे असताना या दोन्ही प्रकल्पाच्या लोकार्पणाचा १ मे चा मुहुर्त हुकला असून आता नवीन मुहुर्ताची प्रतीक्षा आहे. इगतपुरी ते आमणे टप्प्याचे काम पूर्ण झाले असून ७६ किमीचा हा टप्पा वाहतुकीसाठी सज्ज आहे. मात्र लोकार्पणासाठीची तारीख निश्चित होत नसल्याने लोकार्पण रखडले आहे. तर दुसरीकडे मेट्रो ३ मार्गिकेतील टप्पा २ साठी अद्याप सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्याने या टप्प्याचे लोकार्पण रखडल्याचे चित्र आहे.
दोन्ही प्रकल्पाचे एकत्रित लोकार्पण
महाराष्ट्रा राज्य रस्ते विकास महामंडळाकडून ७०१ किमीच्या नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचे बांधकाम करण्यात आले आहे. तर टप्प्याटप्प्यात आतापर्यंत या प्रकल्पातील नागपूर ते इगतपुरी असा ६२५ किमीचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यात आला आहे. तर इगतपुरी ते आमणे या ७६ किमीच्या शेवटच्या टप्प्याचे कामही पूर्ण करण्यात आले आहे. तसेच हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याच्यादृष्टीने सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. एप्रिलमध्ये हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होईल असे वाटत होते. मात्र लोकार्पणाची प्रतीक्षा लांबली आणि शेवटी १ मे चा मुहुर्त निश्चित करत त्यादृष्टीने एमएसआरडीसी कामाला लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ मे रोजी ते मुंबई दौऱ्यावर असताना शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण करण्याचे नियोजन राज्य सरकारचे होते.
यासाठी पंतप्रधानांची वेळही मागण्यात आली होती. मात्र ही वेळ न मिळाल्याने १ मेचा मुहुर्त चुकल्याचे म्हटले जात आहे. तर त्याचवेळी मेट्रो ३ मार्गिकेतील टप्पा २ अ मुळेही समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणास विलंब होत असल्याचे म्हटले जात आहे. राज्य सरकारने समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे आणि मेट्रो ३मार्गिकेतील टप्पा २ अ चे एकाच दिवशी एकाच सोहळ्यात लोकार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. अशावेळी मेट्रो ३ मार्गिकेतील टप्पा २ अ साठी अद्याप मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून सुरक्षा प्रमाणपत्र न मिळाल्याने लोकार्पणा विलंब होत आहे. परिणामी समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याच्या लोकार्पणासाठीही वाट पाहावी लागत आहे.
लवकरच तारीख निश्चित होण्याची शक्यता
याविषयी एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांना विचारले असता, लवकरच लोकार्पणाची तारीख जाहिर होईल, असे सांगितले. मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनकडे (एमएमआरसी) याबाबत विचारणा केली असता सुरक्षा प्रमाणपत्राची प्रतिक्षा असून यासंबंधीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे एमएमआरसीकडून सांगितले जात आहे. एकूणच लोकार्पणाची तारीख अद्याप निश्चित नसून दोन्ही प्रकल्पाच्या लोकार्पणाची प्रतीक्षा मुंबईकरांना करावी लागणार आहे. दरम्यान बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक, वरळी टप्पा २ अ सेवेत दाखल झाल्यास मुंबईकरांना आरे ते आचार्य अत्रे चौक, वरळी प्रवास भुयारी मेट्रोने अवघ्या काही मिनिटात करणे शक्य होणार आहे. इगतपुरी ते आमणे टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास नागपूर ते मुंबई अंतर केवळ आठ तासात कापण्याचे मुंबईकरांचे स्वप्नही प्रत्यक्षात उतरणार आहे. त्यामुळेच या दोन्ही प्रकल्पाची प्रतीक्षा मुंबईकरांना आहे. येत्या दोन-तीन दिवसात लोकार्पणाची ताऱीख निश्चित होण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.