मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ची रविवारी १७ मार्चला मुंबईत शिवाजी पार्कवर जाहीर सभेने सांगता होणार आहे. त्यावेळी इंडिया आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या सांगता सभेतच लोकसभा निवडणूक प्रचाराचे बिगुल फुंकले जाणार आहे. त्यादृष्टीने प्रदेश काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा १२ मार्चला नंदूरबार येथून महाराष्ट्रात प्रवेश करेल व १७ मार्चला मुंबईत समारोप होणार आहे. मुंबईतील शिवाजी पार्कवर न्याय यात्रेची सांगता सभा होणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

हेही वाचा >>> अभिनेत्री क्रांती रेडकरला ठार मारण्याची धमकी, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

भारत जोडो न्याय यात्रेच्या तयारीसाठी राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. राहुल गांधी यांचे नंदुरबार ते मुंबई या प्रवासात अनेक कार्यक्रम होतील व त्यासाठी त्या-त्या भागातील नेत्यांना जबाबदाऱ्या दिल्या आहेत.

शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी परवानगी मागितली होती व ती मिळाली आहे. भारत जोडो न्याय यात्रा छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या भूमीत येत आहे. या महापुरुषांच्या विचारांना संपवण्याचे काम केंद्रातील व राज्यातील भाजप सरकार करत आहे. भाजप लोकशाही व संविधान संपवायला निघाले आहे परंतु त्यांना जशास तसे उत्तर देण्याची आमची तयारी आहे, असे पटोले यांनी म्हटले आहे.

हेही वाचा >>> मराठा आरक्षण : वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला अंतरिम स्थगिती नाही, प्रवेश प्रक्रियेसाठी केलेले अर्ज पुढील आदेशाच्या अधीन असल्याचे उच्च न्यायालयाकडून स्पष्ट

शिवाजी पार्कवर सभेसाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने परवानगी दिली आहे. राहुल गांधी यांच्या सभांना काही राज्यांमध्ये परवानगी नाकारण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कच्या सभेसाठी लवकर परवानगी मिळण्याबाबत काँग्रेस नेते साशंक होते. पण सरकारने परवानगी दिली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi bharat jodo nyay yatra will end with rally at shivaji park in mumbai zws