महाराष्ट्रात करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रूग्ण कल्याण डोंबिवलीत सापडल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. “जनतेने घाबरून जाण्याचं शून्य टक्के देखील कारण नाही. कारण दक्षिण अफ्रिकेत मृत्यू दर नाही. तसेच रुग्णालयात दाखल होणाऱ्या रूग्णांचंही प्रमाण नाही,” असं मत राजेश टोपे यांनी व्यक्त केलं. तसेच नागरिकांनी केवळ दोनच गोष्टींचं १०० टक्के पालन करावं, असं आवाहन केलं. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजेश टोपे म्हणाले, “ओमायक्रॉनचा पहिला रूग्ण महाराष्ट्रात सापडला आहे. मागील ४-५ दिवसांपासून कल्याण डोंबिवलीतील ज्या रूग्णावर कस्तुरबा गांधी रुग्णालयात उपचार सुरू होते तो रूग्ण ओमायक्रॉन बाधित निघाला आहे. असं असलं तरी घाबरण्याचं शून्य टक्के कारण नाही. कारण दक्षिण अफ्रिकेचा पूर्ण अभ्यास केला तरी तिथंही मृत्यू दर नाही. मोठ्या प्रमाणात रुग्णालयात रूग्ण दाखल होण्याचं प्रमाणही नाही. मात्र, या विषाणूचा संसर्ग फार मोठ्या प्रमाणात होतो. ओमायक्रॉन विषाणूची संसर्ग करण्याची क्षमता खूप आहे.”

आता आपल्याला काय करावं लागेल?

“आता आपल्याला या ओमायक्रॉन रूग्णाचे जवळचे संपर्क असलेल्या व्यक्तींचे नमुने घेऊन हा संसर्ग तपासावा लागेल. कारण मला तज्ज्ञांनी सांगितलेल्या माहितीनुसार एखादा व्यक्ती ५ मिनिटं जरी ओमायक्रॉन रूग्णाच्या जवळ बसला तरी तो या विषाणूने बाधित होतो. या विषाणूचा संसर्ग तर खूप आहे हाच काळजीचा विषय आहे. म्हणूनच या रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करून संसर्गाची माहिती घ्यावी लागेल. तसेच संसर्ग थांबवावा लागेल. ही काळजी घेण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

राजेश टोपे पहिल्या ओमायक्रॉन रूग्णाच्या लक्षणांविषयी बोलताना म्हणाले, “या रूग्णाला सौम्य लक्षणं आहेत. ही लक्षणं डेल्टा विषाणूप्रमाणेच आहेत. यात खोकला, सर्दी, अंगदुखी, ताप अशी लक्षणं आहेत. यावर सध्या अभ्यास सुरू आहे. नंतर जागतिक आरोग्य संघटनेच्या ज्या सूचना येतील त्याची अंमलबजावणी करावी लागेल. आज तरी आपण आपल्याला संसर्ग होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.”

राज्यात एकूण किती जणांची ओमायक्रॉन संसर्गाची चाचणी होतेय?

“राज्यात एकूण २८ नमुन्यांची ओमायक्रॉन विषाणू संसर्गाची चाचणी केली जात आहे. त्यातील १२ नमुने कस्तुरबा रुग्णालयात आहेत आणि १६ नमुने नॅशनल इंस्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजी येथे आहेत. या २८ नमुन्यांचा अहवाला यायला २-३ दिवस लागतील. त्यानंतर त्यांच्या संसर्गाबाबत माहिती कळेल,” असंही राजेश टोपे यांनी नमूद केलं.

हेही वाचा : चिंताजनक, करोनाचा ओमायक्रॉन विषाणू महाराष्ट्रात दाखल, कल्याण-डोंबिवलीत पहिला रुग्ण

जनतेने काय काळजी घ्यावी?

“जनतेने कोविडच्या नियमांचं १०० टक्के पालन करावं आणि करोना विरोधी लसीकरण घ्या. या दोनच गोष्टी आहेत, त्या कुठल्याही परिस्थितीत न चुकता कराव्यात एवढीच माझी नम्रतेची विनंती महाराष्ट्राच्या जनतेला आहे,” असं आवाहन आरोग्यमंत्री टोपे यांनी केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajesh tope first reaction after first corona omicron variant infected patient found in kalyan dombivali maharashtra pbs
First published on: 04-12-2021 at 21:06 IST