मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज (२ नोव्हेंबर) नववा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर सडकून टीका केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत मनोज जरांगेंच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास महाराष्ट्र पेटेल, असा इशारा दिला. ते मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय राऊत म्हणाले, “सरकारला किती वेळ हवा आहे असा प्रश्न मनोज जरांगे पाटलांनी विचारला आहे. त्याचं उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देत आहेत का? सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांना जरूर भेटावं, हा सरकारचा अधिकार आहे. सरकारने जरांगेंशी चर्चा करावी. आमची भूमिका स्पष्ट आहे की, आदिवासी, ओबीसी किंवा इतर समाज अशा कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाची मागणी मान्य व्हावी. हे करणं केंद्र सरकारच्याच हातात आहे.”

“मनोज जरांगेंच्या जीवाचं काही बरंवाईट झालं, तर…”

“मराठा आरक्षणाचा निर्णय केंद्र सरकारच्या हातात आहे, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारात गुंतले आहेत. अमित शाह छत्तीसगडपासून मिझोरामपर्यंत फिरत आहेत आणि महाराष्ट्र पेटला आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर महाराष्ट्रात लोक आत्महत्या करत आहेत. मनोज जरांगे पाटलांचे प्राण पणाला लागले आहेत. त्यांच्या जीवाचं काही बरंवाईट झालं, तर हा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही,” असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : “तुमची स्क्रिप्ट कुठून लिहून येतेय?”; भाजपा आमदाराच्या वक्तव्यावर मनोज जरांगे स्पष्टच म्हणाले…

“मोदींनी मनोज जरांगेंना फोन करून बोललं पाहिजे”

संजय राऊत पुढे म्हणाले, “सरकारला महाराष्ट्र पेटवायचा आहे का? त्यासाठीच हे सर्व चालू आहे का? पंतप्रधान मोदींनी किमान दुरध्वनीवरून मनोज जरांगेंशी बोलले तरी पाहिजे. तेही बोलायला त्यांच्याकडे वेळ नाही का?”

हेही वाचा : “माझ्या वडिलांच्या जीवाला काही झालं, तर राजकीय नेत्यांना घरात घुसून…”; मनोज जरांगेंच्या मुलीचं वक्तव्य

“मोदी जगभरातील नेत्यांना मिठ्या मारतात, पण…”

मोदी एक-एक तास मन की बात करतात, जगभरात फिरतात, जगभरातील नेत्यांना मिठ्या मारतात, पण महाराष्ट्राच्या सुपुत्राने आपला जीव पणाला लावलाय त्याच्याशी बोलायला वेळ नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय करतात? त्यांना दिल्लीचा आशीर्वाद आहे ना? त्यांनी जरांगे पाटलांचे प्राण वाचवावेत,” असंही राऊतांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut mention pm narendra modi criticize over maratha reservation pbs