लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: गणेशोत्सव अवघ्या दीड महिन्यांवर आला असून मुंबईमधील गणेश कार्यशाळांमध्ये गणेशमूर्ती घडविण्यासाठी मूर्तिकारांची, उत्सवाच्या तयारीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली आहे. शासकीय यंत्रणाही गणेशोत्सवाच्या नियोजनात व्यस्त झाल्या आहे. मुंबई महानगरपालिकेने गणेश विसर्जन सोहळ्यात कमतरता भासू नये, नैसर्गिक स्रोतांचे संवर्धन व्हावे या उद्देशाने यंदा गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यंदा मुंबईमध्ये विसर्जनासाठी ३०८ कृत्रिम तलाव उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर ६९ नैसर्गिक विसर्जन स्थळी गणेश विसर्जन व्यवस्था करण्यात येणार आहे.
गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेपला आहे. सर्वच स्तरावर तयारीची लगबग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी मुंबई महापालिका मुख्यालयात संयुक्त बैठक घेऊन गणेश मूर्तिकार, गणेशोत्सव मंडळे आणि गणेश भक्तांच्या विविध अडचणी व समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्यासह महापालिका अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे व गणेशोत्सव समन्वय महासंघाचे अध्यक्ष जयेंद्र साळगावकर, सरचिटणीस सुरेश सरनौबत व अन्य पदाधिकारी मूर्तिकार संघाचे पदाधिकारी, भाजपाचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे आदी सर्व उपस्थित होते. यावेळी कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार महानगरपालिका प्रशासनाने यंदा कृत्रिम तलावांची संख्या वाढवली आहे.
आणखी वाचा-मुंबई: अभिनेता पुनित सिंह राजपूतविरोधात बलात्काराचा गुन्हा, अभिनेत्रीने दाखल केली तक्रार
गेल्यावर्षीपर्यंत केवळ १६२ ते १७३ कृत्रिम तलाव तयार केले जात. यंदा तलावांची संख्या दुप्पट करण्यात आली आहे. सरसकट पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदी घालून कारखान्यांवर धाडसत्र, अशी कारवाई महापालिका करणार होती. त्यालाही या बैठकीत विरोध करण्यात आला होता. पर्यावरण पूरक गणेशमूर्ती असाव्यात हा आग्रह चांगला आहे, मात्र एकाएकी निर्णय घेऊन एवढा मोठा बदल करता येणार नाही. त्यासाठी मूर्तीकारांना काही वेळ द्यावा लागेल , अशी भूमिका भाजपतर्फे मांडण्यात आली. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्यात येणार आहे. पीओपी मूर्ती विसर्जन झाल्यानंतर त्यांचे योग्य पद्धतीने विघटन करावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत. तसेच मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चायनीज गणेशमूर्ती येत असून त्यावर सरसकट बंदी घालावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली, त्याबाबत महापालिकेने तयारी दाखवली आहे.
आणखी वाचा- मुंबई: प्राणीही साथीच्या आजारांनी त्रस्त
यंदा मूर्तीकारांना मूर्ती घडवण्यासाठी ४५ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी किमान ५ ते १० मूर्तिकार काम करू शकतात. यंदा मुंबई महानगरपालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पुढाकार घेतला आहे. पर्यावरणपूरक मूर्ती घडवण्यासाठी मूर्तिकारांना देण्यासाठी २०५ मेट्रीक टन शाडू माती उपलब्ध करण्यात आली आहे. मूर्तिकारांच्या मागणीनुसार अधिक माती उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय, शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, स्वच्छता, वृक्षछाटणी आदी कामेही सुरू आहेत. निर्माल्य कलशाची व्यवस्था, वैद्यकीय चमू, विसर्जनाच्या ठिकाणी जीवरक्षकांची नेमूणक आदी बाबीही निश्चित करण्यात आल्याची माहिती महापालिका पालिका अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली.
