यवतमाळ : भाजपाची लबाडी महाराष्ट्रातील जनतेने ओळखली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना फोडून केलेले राजकारण भविष्यात भाजपाच्या अंगलट येईल. खुद्द देवेंद्र फडणवीस यांची नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील जागा धोक्यात असल्याचा खळबळजनक दावा शिवसेन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज, गुरुवारी येथील विश्रामभवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते गंभीर आजारी होते. त्यावेळी फडणवीस यांनी डावपेच खेळून शिंदे व त्यांच्या समर्थकांना आपल्या जाळ्यात ओढले आणि शिवसेना फोडली. फडणवीस यांनी अत्यंत गलिच्छ राजकारण केले. महाराष्ट्रातील सुज्ञ जनता भाजपाला कधीच माफ करणार नाही. जनतेची नाराजी आता भाजपाला दिसत असल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आमचे किमान ३८ खासदार राज्यात निवडून येतील, असा विश्वासही खैरे यांनी यावेळी बोलून दाखवला. येत्या निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घ्यावा, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी सर्वपक्षीय लढा उभारू, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – लोकसत्ता इम्पॅक्ट : ‘सखी वन स्टॉप सेंटर’मधील असुविधांवरून राज्य महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे यांची नाराजी

भाजपाचा जनाधार कमी होत असल्याचे चित्र सार्वत्रिक आहे. भाजपासह शिंदे गटातील अनेक आमदार पुन्हा निवडून येणार नाही. गलिच्छ राजकारण करताना मतदारसंघाकडे दुर्लक्ष झाल्याने खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जागा धोक्यात असल्याची माहिती नागपुरातील संघ वर्तुळातील मित्रांनी दिल्याचे खैरे यांनी सांगितले. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी आता आठवड्यातून चार दिवस नागपुरात राहून मतदारसंघाची बांधणी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे खैरे म्हणाले. विदर्भात शिवगर्जना यात्रेस नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, उद्धव ठाकरे व निष्ठावान शिवसैनिकांप्रती नागरिकांमध्ये सहानुभूती असल्याचे आढळले, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – चंद्रपूरमधील राजकीय समीकरणे कायम

गडकरींना साथ दिली

आपण खासदार असताना अटलबिहारी बाजपेयी, मनमोहनसिंग यांची पंतप्रधानपदाची कारकीर्द जवळून बघितली आहे. मात्र, त्यावेळी सुडाचे राजकारण कधीच नव्हते. २०१४ मध्ये एनडीए सरकार स्थापन झाल्यापासून देशात व राज्यात सत्तेसाठी सुडाचे राजकारण सुरू झाले. नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात सत्तेत असलेल्या मित्रपक्षांना कधीच सन्मानाची वागणूक मिळाली नाही. खासदारांना कधीही भरीव निधी मिळाला नाही. अपवाद केवळ नितीन गडकरींचा राहिला. त्यांनी सर्वपक्षीय खासदारांना विकासकामांसाठी निधीची कधीही उणीव भासू दिली नाही. त्यांनी आम्हा सर्वांनाच साथ दिली, असे चंद्रकांत खैरे यांनी यावेळी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrakant khaire comment on devendra fadnavis in yavatmal says fadnavis seat in nagpur is in danger nrp 78 ssb