नागपूर: अटीतटीच्या वळणावर गेलेल्या नागपूर लोकसभा मतदार संघातील निवडणुकीत प्रत्येक मत महत्वाचे ठरणार आहे. भाजपने युवा व नवमतदारांवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. महाविकास आघाडीची यंत्रणा या कामी लागली आहे. पुण्यात नोकरी किंवा शिक्षणासाठी गेलेल्या पन्नास हजारांहून अधिक मतदारांना मतदानासाठी नागपूरमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.

जिल्हा प्रशासनासह महाविकास आघाडी आणि महायुतीने मतदानाची टक्केवारी वाढावी तसेत जास्तीत जास्त युवा तसेच नवमतदारांनी मतदान करावे यासाठी जनजागृती व प्रचार, प्रसार केला जात आहे. नागपूरमध्ये एकूण २२ लाख मतदार असून त्यात सरासरी दीड लाखांहून अधिक नवमतदार व युवा मतदारांची संख्या आहे. यातील अनेक जण सध्या पुण्यात नोकरी निमित्त वा अन्य कारणाने पुण्यात रहायला किंवा शिक्षणासाठी, व्यवसायासाठी किंवा काही कामासाठी आले आहेत. सध्या नागपूरला जाण्यासाठी रेल्वे आणि बसेसची आरक्षणे फुल्ल झाली आहेत. त्यामुळे केवळ मतदानासाठी नागपूरला येणे अनेकांना अवघड आहे. ही बाब लक्षात घेऊनच त्यांना नागपूरला (१९ एप्रिल) मतदानाला जाण्यासाठी विदर्भ मित्रमंडळातर्फे निशुल्क बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. विदर्भ मित्र मंडळाने यासाठी पुढाकार घेतला आहे. आतापर्यंत दोन बस बुक झाल्या असून सरासरी पाच बसेस १८ एप्रिलला पुण्याहून निघणार असून १९ ला सकाळी नागपूरला पोहोचणार आहे. या बसेसव्दारे येणाऱ्यांना परत पुण्याला बसव्दारेच सोडून देण्यात येणार आहेत, असे विदर्भ मित्र मंडळाचे श्रीपाद बोरीकर यांनी सांगितले.

हेही वाचा : अमरावती: सिलिंडरचा स्फोट, चार चिमुकल्यांसह नऊ गंभीर….

बोरीकर म्हणाले यावेळेची लोकसभेची निवडणूक महत्वाची असून त्यासाठी शंभर टक्के मतदान होणे गरजेचे आहे, त्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, त्यासाठी बोरीकर हे स्वत: पुण्यात जाऊन त्यांनी तेथील नागपूरकरांशी संपर्क साधला. समाजमाध्यमांच्या माध्यमातून याबाबत आवाहन करण्यात आले. सुमारे पाच बसेस पुण्यातून निघतील, असे बोरीकर यांनी सांगितले. विदर्भ मित्र मंडळासह प्रबोधन मंच, विदर्भवासी पुणे निवासी या संघटनाचेही या उपक्रमासाठी मदत होत आहे. अधिक माहितीसाठी ९८८१२००३६९ किंवा ७५१७७७१३६९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.