वर्धा : सोनार व्यावसायिकांना अडअडचणी व समस्यांची सोडवणूक तसेच अनेक प्रकरणात पोलिसांकडून होणा-या कार्रवाई दरम्यान उद्भविणा-या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकरातून राज्य व जिल्हा स्तरावर दक्षता समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीत पोलिस अधिका-यांसह सोनार व्यावसायिकांचा समावेश करण्यात आला आहे.

सोनार व्यायसायिकांना व्यवसाय करताना अनेक अडचणी निर्माण होत होत्या. पोलिसांकडून कार्रवाईच्या नावावर सोनार व्यावसायिकांची गळचेपी करण्यात येत असल्याचा आरोप सातत्याने होत होता. त्यामुळे अनेक सोनार व्यावसायिक व पोलीस आमने सामने आल्याच्या घटना राज्यात घडल्या.

पोलीस कारवाईच्या विरोधात अनेकदा सोनारांनी आंदोलनाची भूमिका घेतली होती. सोनार व्यावसायिक व पोलिस यांच्यात समन्वय असावा, यासाठी समिती स्थापन करण्याची मागणी होत होती. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापुढे डॉ. भोयर यांनी ही बाब उपस्थित केली हाती.गृह राज्यमंत्री असलेल्या डॉ. भोयर यांनी पुढाकार घेत सुवर्णकार संघटनेशी चर्चा केली. अखेर सोनार व्यावसायिक व पोलिस यांच्यात समन्वय स्थापन करण्यासाठी राज्यस्तर, पोलिस आयुक्तालय व जिल्हा स्तरावर समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सोनार व्यावसायिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी गृह विभागाने राज्यस्तरीय दक्षता समिती स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्ष विशेष पोलिस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) हे राहणार.सदस्य म्हणून पोलिस महासंचालकांचे विधी सल्लागार, सदस्य सचिव म्हणून पोलिस अधीक्षक राज्य पोलिस नियंत्रण कक्ष हे असतील.

सदस्य म्हणून नितीन खंडेलवाल,शैलेश खराटे- अकोला, राजेश रोकडे- नागपूर,सुधाकर टांक,किरण अंदिलकर – पुणे, महावीर गांधी,गिरीष देवरमनी – सोलापूर,भरत ओसवाल- कोल्हापूर, सुभाष वडाला, अजीत पेंडूरकर – मुंबई, राजेंद्र दिंडोरकर – नाशिक व अमोल ढोमणे – वर्धा यांचा समावेश करण्यात आला आहे.

सोनार समाजाला व्यवसाय करताना नेहमीच पोलिस कार्रवाईच्या दडपणाखाली राहावे लागते होते. अनेकदा पोलिस कार्रवाई दरम्यान सोनारांची गळचेपी होत होती. नाहक सोनार समाजाला गोवल्या जात असल्याची भावना वाढत होती. ही समिती केवळ भारतात अस्तित्वात आली आहे. या समितीमध्ये सोनार समाजाचा समावेश असल्याने त्यांच्या समस्या व उडचणींचा सोडवणूक होणार आहे. समाजाच्यावतीने मुख्यमंत्री फडणवीस व गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचे संघटनेने आभार मानले आहे.

समिती सदस्य व प्रसिद्ध एमटीडी ज्वेलर्सचे संचालक अमोल ढोमणे म्हणतात की आम्हा व्यावसायिकांना अनेक वर्षांपासून पोलिस कारवाईला सामोरे जावे लागण्याची आपत्ती असते.वर्धेतदेखील अशा कारवाईमुळे सराफा व्यावसायिकाला जीव गमवावा लागला होता. पण आता दक्षता समिती स्थापना करण्याचा निर्णय झाल्यामुळे आमच्या अडीअडचणी व समस्यांची सोडवणूक होणार असून पोलिस कारवाईच्या संदर्भात काही नियम व निकष तयार होईल. त्यामुळे पोलिस व सराफा व्यावसायिक यांच्यात समन्वय वाढेल व दोघांना त्रास होणार नाही.मुख्यमंत्री फडणवीस व वर्धेचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दस-याच्या पर्वावर समाजाला मोठी भेट दिली आहे.