नागपूर: केंद्र आणि राज्य सरकारच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी विविध योजना सुरू आहेत. विद्यार्थ्यांना शहराच्या ठिकाणी जाऊन उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी अनेक योजना आहेत. यात वसतिगृहासह विद्यार्थ्यांसाठी अन्य योजनाही आहेत. अनेकदा या योजनांची माहिती विद्यार्थ्यांना नसते. त्यामुळे शासकीय योजनाचा लाभ न घेता विद्यार्थी आर्थिक भार सहन करतात. त्यामुळे खाली देण्यात आलेली एका महत्त्वाच्या योजनेसंदर्भातील माहिती सविस्तर वाचा. यामुळे तुम्हाला मोठ्या शहरातील नामवंत महाविद्यालयात उच्च शिक्षण घेणे सोपे होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही महाराष्ट्र शासनाने २०१६-१७ मध्ये सुरू केलेली एक शैक्षणिक योजना आहे. इयत्ता अकरावी, बारावी आणि त्यानंतरच्या व्यावसायिक, तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या, परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेत भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सन २०२४-२५ या वर्षासाठी https://hmas.mahait.org या पोर्टलद्वारे नागपूर जिल्हयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याकरीता संकेतस्थळ सुरु करण्यात आले असून अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करुन अर्जाची प्रत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर येथे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा : नागपूर: सायबर गुन्हे थांबविण्यासाठी सायबर क्लब

योजनेची पात्रता व प्रक्रिया काय आहे?

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच लाभ फक्त अनुसूचित जाती व नवबौद्ध या प्रवर्गांना मिळेल. यासाठी विद्यार्थ्याने जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्याचे बँक खाते उघडलेले असेल ते आधार कार्डशी लिंक असले पाहिजे, पालकांचे उत्पन्न अडीज लाखांपेक्षा जास्त नसावे. विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. विद्यार्थी हा स्थानिक नसावा. म्हणजेच विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली संस्था ज्या ठिकाणी आहे अश्या ठिकाणचा लाभार्थी राहणारा नसावा. विद्यार्थी हा इयत्ता ११ वी, १२ वी आणि त्यानंतरचे शिक्षण हे दोन वर्षापेक्षा कमी कालावधी नसलेल्या उच्च शिक्षण घेणारा असावा. ११ वी व १२ वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला १० वी मध्ये कमीत-कमी ६० टक्के गुण असणे अनिवार्य आहे. विद्यार्थी १२ वी नंतरचा दोन वर्षाकरिता जास्त कालवधी असलेल्या पदविका किंवा पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला १२ वी मध्ये ६० टक्के पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे.

हेही वाचा : शरद पवार पुन्हा वर्धा जिल्हा दौऱ्यावर, सोबत नितीन गडकरीही… काय आहे विशेष जाणून घ्या

निवड प्रक्रियेच्या या नियमांकडेही लक्ष द्या

स्वाधार योजनेसाठी काही नियम आणि अटी घालून दिल्या आहेत. त्यानुसार निवड प्रक्रिया होते. यानुसार, दोन वर्षापेक्षा कमी कालावधी नसणाऱ्या कोणत्याही मान्यता प्राप्त अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याना योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक वर्षी किमान ६०टक्के गुण किंवा त्या प्रमाणात ग्रेड किंवा ‘सीजीपीए’चे गुण असणे आवश्यक राहतील. विद्यार्थ्याला १२ वी नंतर पदविका किंवा पदवीसाठी प्रवेश घ्यायचा असेल तर अभ्यासक्रम हा २ वर्षापेक्षा कमी नसावा. पदवीनंतर पदव्युतर पदवी किंवा पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी हा दोन वर्षापेक्षा कमी नसावा. विद्यार्थ्याची निवड ही त्याच्या गुणवत्तेनुसार करण्यात येईल. निवड झालेल्या विधार्थी संबधित अभ्यासक्रम जेव्हा पूर्ण करेल तेव्हाच तो स्वाधार योजनेचा लाभास पात्र असेल. स्वाधार योजनेसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ३ टक्के आरक्षण असेल. दिव्यांग विद्यार्थ्यांना गुणाची पात्रता ही किमान ५० टक्के असेल. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यापासून प्रत्येक सत्राची परीक्षा निकालाची प्रत निकाल लागल्यापासून १५ दिवसाच्या आतमध्ये नेमून दिलेल्या कार्यालयात सादर करणे बंधनकारक रहील. स्वाधार योजनेचा लाभ मंजूर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी किमान ६० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे नाहीतर ज्या विद्यार्थ्याला ६० टक्के पेक्षा कमी गुण मिळतील असा विद्यार्थी ह्या योजनेस अपात्र ठरेल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra government will bear expenses of higher education of students under dr babasaheb ambedkar swadhar yojana dag 87 css