अकोला : लोकसभा निवडणुकीत आमदारांचीसुद्धा कसोटी लागणार आहे. अकोला लोकसभा मतदारासंघात विधानसभा मतदारसंघनिहाय मतांचे गणित निर्णायक ठरेल. विधानसभा मतदारसंघात मतांचे दान प्राप्त करून घेण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ सुरू आहे. त्यामुळे आमदारांची प्रतिष्ठादेखील पणाला लागल्याचे चित्र आहे. कुठला मतदारसंघ कुणाला साथ देतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अकोला लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यातील अकोला पूर्व, मूर्तिजापूर आणि अकोट भाजपच्या ताब्यात असून बाळापूर येथे शिवसेना ठाकरे गट व रिसोडमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत. दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे अकोला पश्चिमची जागा रिक्त असली तरी हा मतदारसंघ गेल्या तीन दशकांपासून भाजपचा गड म्हणून ओळखला जातो.

हेही वाचा…बुलढाणा : चार पिस्टलसह जिवंत काडतुसे जप्त, मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात कारवाई

२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत सहाही विधानसभा मतदारसंघांवर खासदार संजय धोत्रे यांनी विक्रमी मताधिक्य मिळवले होते. त्यामध्ये अकोट मतदारसंघात संजय धोत्रे यांना ९६ हजार ७०६, तर काँग्रेसचे हिदायत पटेल यांना ४४ हजार ४९५, ॲड. प्रकाश आंबेडकरांना ३९ हजार १७७ मते पडली. बाळापूरमध्ये तत्कालीन आमदार वंचितचे असताना देखील ॲड. आंबेडकरांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. धोत्रेंना ८० हजार ४८८, ॲड. आंबेडकरांना ५६ हजार ९८१ मते, तर पटेलांना ४८ हजार ०६१ मते मिळाली.

अकोला पश्चिममध्ये धोत्रे ७८ हजार ७६९, पटेल ६३ हजार ६३८, ॲड. आंबेडकर २३ हजार ७४१ मते प्राप्त झाली होती. अकोला पूर्वमध्ये भाजपने मोठे मताधिक्य प्राप्त केले होते. त्यात धोत्रे यांना एक लाख ११ हजार ११५, दुसऱ्या क्रमांकाची मते ॲड. आंबेडकर यांना ६१ हजार ७१२, तर पटेल यांना केवळ २० हजार ८६७ मतांवर समाधान मानावे लागले. मूर्तिजापूरमध्ये धोत्रेंना ९० हजार ११५, पटेलांना ३७ हजार ४५०, तर ॲड. आंबेडकरांना ५२ हजार २३० मते मिळाली होती. रिसोड मतदारसंघात काँग्रेस आमदार असतानाही भाजपने दुपटीहून आघाडी घेतली होती. धोत्रे यांना ९० हजार ९०५, पटेल यांना ३९ हजार ५८३, तर ॲड. आंबेडकर यांनी ४४ हजार ४०० मते मिळाली.

हेही वाचा…जगातील सर्वात कमी उंचीच्या महिलेचे नागपुरात मतदान

अकोट आणि अकोला पश्चिम वगळता उर्वरित चार मतदारसंघात वंचितने दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. २०१९ च्या तुलनेत आता मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीत मोठा फेरबदल झाला. ॲड. आंबेडकर रिंगणात कायम असून भाजपचे अनुप धोत्रे व काँग्रेसचे डॉ. अभय पाटील पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. गेल्या निवडणुकीत धार्मिक रंग चढल्याने भाजपला एकतर्फी यश मिळवले होते. आता दोन मराठा समाजाचे उमेदवार असल्याने मतांचे मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण होणार आहे. जातीय समीकरण जुळवून आणण्यावर उमेदवारांचा भर आहे. गेल्या निवडणुकीतील सर्वच विधानसभानिहाय मिळालेले मताधिक्य कायम राखण्याचे भाजपपुढे, तर काँग्रेस व वंचितपुढे मतदान वाढवण्याचे आव्हान आहे.त्या दृष्टीने संबंधित मतदारसंघाच्या आमदारांवर मोठी जबाबदारी असून त्यांच्या कामगिरीकडे पक्षांच्या वरिष्ठांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष राहणार आहे.

हेही वाचा…नागपूर : ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड,’येथे’ मतदानाला एक तास उशिरा सुरुवात

चार महिन्यांतच समीकरणात बदल

२०१९ मध्ये एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुकीनंतर ऑक्टोबरमध्ये विधानसभेचे निवडणूक झाली होती. या चार महिन्यांच्या कालावधीतच मतांच्या समीकरणात मोठा बदल झाल्याचे दिसून आले. विधानसभा निवडणुकीत बाळापूरमध्ये तत्कालीन भाजप-सेना युतीचे उमेदवार नितीन देशमुख यांना ६९ हजार ३४३, अकोला पश्चिममध्ये भाजपचे दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांना ७३ हजार २६२, अकोला पूर्वमध्ये भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांना एक लाख ४७५, मूर्तिजापूरमध्ये भाजपचे हरीश पिंपळे यांना ५९ हजार ५२७, अकोटमध्ये प्रकाश भारसाकळे यांना ४८ हजार ५४६, तर वाशीम जिल्ह्यातील रिसोड मतदारसंघात काँग्रेसचे अमित झनक यांना ६९ हजार ८७५ मते मिळाली होती. लोकसभेच्या तुलनेत विधानसभेमध्ये सर्वच ठिकाणी भाजपच्या मतांमध्ये घसरण झाली होती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla s reputations at stake in akola lok sabha as vidhan saba constituency wise votes will decisive in mp s election ppd 88 psg