नागपूर : आपल्या मतानुसार जर कुणी आपली पूजा पद्धती बदलत असेल तर संघाने कधीही त्यावर आक्षेप घेतला नाही. नारायण वामन टिळक हे त्याचे उदाहरण आहे. संघामध्ये याला मान्यता आहे. धर्मांतरासाठी केली जाणारी सक्ती मात्र मान्य नाही, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
नागपुरात गुरुवारी आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग-२ च्या समारोपीय सोहळ्यात सरसंघचालक बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री अरविंद नेताम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. डॉ. भागवत पुढे म्हणाले, लोभ, लालच दाखवणे, जबरदस्ती करणे, तुमचा मार्ग, पूर्वज चुकीचे होते हे सांगून आम्हीच तुम्हाला खरा मार्ग दाखवतो, असे सांगत असेल तर ही एकप्रकारची शिवी आहे.
हा हिंसेसारखा प्रकार आहे. आम्ही कधीही अशा गोष्टीचे समर्थन करणार नाही. पंथ, संप्रदायाला संघाचा विरोध नाही. ईसा मसिह, पैगंबर सगळ्यांवर श्रद्धा आहे. त्यात आम्हीही सहभागी आहोत. आपापल्या पद्धतीने सगळे उपासना करतात. मात्र, लोभाला बळी पडून किंवा जबरदस्तीने कुणी गेला असेल आणि आज परत येत असेल तर त्याचा स्वीकार करायला हवा. ही एकप्रकारची सुधारणा आहे.
आदिवासी समाज वेगळा नाही. आमची संस्कृती जंगल आणि शेतातून जन्माला आली. आदिवासी समाज आमचे मूळ आहे. झाडांची पूजा करणे ही परंपरा जगात केवळ भारतात आहे, असेही ते म्हणाले. महानगर संघचालक राजेश लोया यांनी अमेरिकेतून कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांचा परिचय करून दिला.
प्रतिक्रिया म्हणून कायदा हातात घेणे गैर
आमचा देश विविधतेचा देश असून येथे अनेक समस्याही आहेत. एकासाठी लाभाची गोष्ट दुसऱ्यासाठी नुकसानीची ठरू शकते. त्यामुळे असंतोषही वाढतो. यात गैर नाही. परंतु, देशहितासमोर आमच्यासाठी इतर काहीही नाही. समाजातील कुठल्याही वर्गाची दुसऱ्या वर्गासोबत लढाई होणार नाही याचे भान ठेवावे लागेल.
भावनेच्या भरात नको ते करून बसणे, आवश्यक नसताना भांडण करणे, प्रतिक्रिया म्हणून कायदा हातात घेणे ही गोष्ट मुळीच योग्य नाही. भांडण लावणारे लोक समाजात आहेत. मात्र, त्यांना बळी पडू नका. सद्भावना, सदाचार, आणि सहकार्य करण्याची गरज आहे. विविधता असली तरी आपले मूळ एकता हेच आहे. भारतीय स्वातंत्र्याचा मूळ उद्देशच एकता असून ते जगाला दाखवून द्यायचे आहे, असेही सरसंघचालक म्हणाले.
देशासाठी सर्व पक्ष एकत्र येणे हीच लोकशाही
‘ऑपरेशन सिंदूर’मुळे भारतीय सेनेची वीरता पुन्हा एकदा जगाने पाहिली. सेनेच्या पराक्रमासोबतच निर्णय घेणाऱ्या सरकारची दृढताही देशाला दिसून आली. सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरून एकता दाखवली. असेच दृश्य कायम राहिले तर ही देशासाठी फार गौरवाची बाब आहे. देशभक्तीच्या वातावरणात राजकीय स्पर्धा विसरले हेच उत्तम लोकशाहीचे दृश्य आहे.
द्विराष्ट्रवादाचा धोका कायम
शांततेत राहता यावे म्हणून पाकिस्तान वेगळा झाला. परंतु, त्यानंतरही अशांती पसरवण्याचा त्यांचा दुटप्पीपणा गेला नाही. द्विराष्ट्रवाद कायम असल्याने धोका राहणार आहे. आतंकवाद्यांना आश्रय देऊन लढले जात आहे. सायबर हल्ले केले जात आहेत. अनेकदा शासन करून आणि जगाने सांगूनही ते सुधारलेले नाहीत. आता युद्धाचे नवीन तंत्रज्ञान आल्याने घरी बसूनही शत्रू राष्ट्रावर वार करता येतो. त्यामुळे आपल्या सुरक्षेसाठी आम्हाला आत्मनिर्भर व्हावे लागेल.
धर्मांतरणावर कायदा करा – नेताम
आदिवासी समाजासमोर आज धर्मांतर ही एक मोठी समस्या आहे. त्यामुळे केंद्र शासनाने धर्मांतरणाबाबत कठोर कायदा करणे आवश्यक आहे. कायदा करताना केंद्राने आमचे मतही विचारात घ्यायला हवे. धर्मांतरण रोखायचे असेल तर कायदा हवाच. यासाठी संघाने मदत करावी, असे आवाहन अरविंद नेताम यांनी केले. नक्षलवाद संपल्यावर ती समस्या दुसऱ्यांदा डाेके वर काढणार नाही, यासाठी संघाने केंद्र सरकारवर दबाव वाढवा, असेही नेताम म्हणाले. सोबतच औद्योगिकरणामुळे आदिवासींच्या जमिनी जात असून ते विस्थापित होत असल्याच्या समस्येकडेही त्यांनी लक्ष वेधले.