गद्दार टोळीचे सरकार पडल्यानंतर आपण गावोगावी जाऊन लोकांशी संवाद साधणार आहोत. आज राज्यात जे सरकार सत्तेवर आहे, ते स्वत:साठी रोजगार शोधत आहे, अशी टीका माजीमंत्री आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- भुताळीण ठरविलेल्या महिलेचा अंनिसमुळे गावाकडून स्वीकार; एकमेकींना साखर भरवून शेवट गोड

शिवसंवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यास सोमवारपासून नाशिकमधून सुरूवात झाली. मुंबईहून नाशिककडे येतांना आदित्य यांनी इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे भेट दिली. यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित होते. मुंढेगाव येथील जिंदाल पॉलीफिल्म कारखाना अलीकडेच भीषण आगीत भस्मसात झाला. त्यात अनेक कामगारांचा मृत्यू झाला असून हे प्रकरण दडपले जात असल्याच्या तक्रारी काहींनी केल्या. कारखान्यात स्थानिकांऐवजी परप्रांतीयांना रोजगार दिला जातो. स्थानिकांना कारखान्यात सामावून घेण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा, असे साकडे त्यांना घातले गेले. जिंदालमधील दुर्घटना कशामुळे घडली, याची चौकशीची मागणी करण्यात आली. परंतु, या सरकारने प्रकरण दाबल्याचा आरोप आदित्य यांनी केला. आगामी विधिमंडळ अधिवेशनात जिंदालबाबत तारांकीत प्रश्न उपस्थित केला जाईल. या दुर्घटनेतील सत्य लोकांसमोर आले पाहिजे. जो उद्योग महाराष्ट्रात येईल, त्यात ८० टक्के स्थानिकांना रोजगार मिळायलाच हवा. राज्यात सत्तेवर बसलेले सरकार हे स्वत:साठी रोजगार शोधत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

हेही वाचा- मुख्यमंत्र्यांनी दिला ठाकरेंना धक्का; नाशिकमधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश

शिवसंवाद यात्रेत अनेक ग्रामपंचायतींना आपण भेटी देणार आहोत. सध्या अस्तित्वात असलेले गद्दार टोळीचे सरकार पडल्यानंतर गावागावात जाऊन लोकांशी बोलणार आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीपोटी भरीव मदत दिली गेली होती. मात्र आता शिंदे सरकार सत्तेवर आहे. गेल्या सहा महिन्यात शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही या सरकारने शेतकऱ्यांना कवडीची मदत न करता कागदोपत्री नुकसान भरपाई दिल्याचे भासविले, असा आरोप त्यांनी केला. या सरकारमधील कृषिमंत्री कोणत्याच शेतकऱ्यांच्या बांधावर फिरतांना दिसून आले नाही. आमच्याकडे ५० शिवसैनिक असले तरीही आपण त्यांच्याशी संवाद साधणार.

हेही वाचा- “तुम्ही लिहून घ्या, आता मंत्रीमंडळ…”, आदित्य ठाकरेंचं मोठं विधान; एकनाथ शिंदे सरकारवर हल्लाबोल!

गद्दारांनी ५० खोके खर्च केले तरी त्यांच्याकडे ५० लोक देखील जाणार नाहीत. कारण, सध्या अस्तित्वात असलेले सरकार हे महाराष्ट्राचे नसून दिल्लीचे सरकार आहे. सध्याचे मुख्यमंत्री दिल्लीला जातात. मात्र ते महाराष्ट्रातील जनतेसाठी जात नसून केवळ स्वतःसाठी जात आहेत. सरकार स्थापन झाल्यापासून गद्दारांना फक्त मंत्रिपदाचे गाजर दाखवले जात असून येत्या काही दिवसात हे सरकार कोसळणार असल्याचा दावा आदित्य यांनी केला. याप्रसंगी जिल्हाप्रमुख विजय करंजकर, उपजिल्हा प्रमुख निवृत्ती जाधव, माजी आमदार निर्मला गावित, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, दत्ता गायकवाड आदी उपस्थित होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackeray criticizes the shinde group in public meeting at mundhegaon in igatpuri taluka during the shivsamvad yatra dpj
First published on: 06-02-2023 at 20:38 IST