मनमाड – रेल्वे प्रशासनाने काही वर्षात मनमाडकरांच्या हक्काच्या चार रेल्वे गाड्या नाशिक जिल्ह्यातून पळवल्या आहेत. आता ३० वर्षापासून मनमाड येथून सुटणारी मनमाड-सिकंदराबाद अजंता एक्स्प्रेस ही गाडी मनमाडऐवजी भुसावळ येथून सोडण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेचे महाव्यवस्थापक आर. के. यादव यांनी दिली आहे. जिल्ह्यातील प्रवाशांना तिरुपतीसह दक्षिण भारतात जाण्यासाठी हक्काची गाडी इतरत्र नेली जात असताना लोकप्रतिनिधींनी मौन बाळगले आहे. यामुळे मनमाडसह जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनमाड-सिकंदराबाद अजंता एक्स्प्रेस ही गाडी मनमाड येथून सायंकाळी नियमितपणे सुटते. दक्षिण भारतात जाण्यासाठी नाशिक जिल्हा नव्हे तर, उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी ही गाडी अत्यंत सोयीची आहे. महाराष्ट्र आणि दक्षिण भारताला जोडणारा हा दुवा आहे. मनमाड येथून या गाडीला प्रवाशांची दररोज तुंबळ गर्दी असते. भुसावळ, जळगाव येथून सिकंदराबादला जाणार्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांना आठवड्यातून फक्त तीनच दिवस थेट रेल्वे गाडी आहे. या गाड्यांना चाळीसगाव, पाचोरा स्थानकावर थांबा नाही. या प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी मनमाड येथून सिकंदराबादला सुटणारी अजंता एक्स्प्रेस आता भुसावळ येथून सोडण्याचा निर्णय विचारात घेऊन याबाबत रेल्वे मंडळाला प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

हेही वाचा >>>त्र्यंबक रस्त्यावरील हॉटेल, लॉजिंग व्यावसायिकांना धक्का; याचिका फेटाळली, बांधकाम अधिकृत करण्यासाठी ३० दिवसांची मुदत

सिकंदराबाद अजंता एक्स्प्रेस रोज सायंकाळी सात वाजता मनमाडहून निघते. दुसर्या दिवशी सकाळी सात वाजता पुन्हा मनमाडला येते. १२ तास ही गाडी मनमाड रेल्वे यार्डमध्ये थांबून असते. त्यामुळे या गाडीला भुसावळपर्यंत आणण्यासाठी वेळेची कोणतीही अडचण नाही. शिवाय भुसावळला गाडीची देखभाल करता येईल, यासाठी रेल्वे मंडळाकडे तसा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. मराठवाडा, दक्षिण भारत आणि श्री क्षेत्र तिरुपती येथे जाण्यासाठी या गाडीला मनमाड येथून प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. पण आता ही गाडी देखील भुसावळला पळवून नेण्याचे रेल्वे प्रशासनाचे धोरण असल्याचे स्पष्ट होत आहे.

तिरूपती येथे जाण्यासाठी वर्षभर नाशिक जिल्ह्यातून अजंता एक्स्प्रेसने जिल्ह्यातील प्रवासी जात असतात. एक्स्प्रेस पळवून दुसर्या जिल्ह्यात नेली जात असतांना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी काय करतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा >>>शहर पोलिसांतर्फे मदतवाहिनी जाहीर

मनमाडचे महत्व

मनमाड हे रेल्वेचे जंक्शन स्थानक आहे. मालेगाव, येवला, नांदगाव, लासलगाव, निफाड आणि उत्तर भारतातून मोठ्या प्रमाणावर प्रवाशांना नाशिक, मुंबई, पुणे, दक्षिण भारतात जाण्यासाठी मनमाडहून स्वतंत्र प्रवासी गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. ज्या गाड्या सुरू केल्या, त्या रेल्वे प्रशासनाने अक्षरशः पळवून नेत मनमाडकरांवर पर्यायाने नाशिक जिल्ह्यावर अन्याय केल्याची भावना उमटत आहे.

नाशिकमधून इतरत्र नेलेल्या गाड्या

मनमाड-मुंबई तपोवन एक्स्प्रेस ही मनमाडहून सुटत होती, ती आता नांदेडपर्यंत वळवली. भुसावळ-मुंबई देवगिरी एक्स्प्रेस ही गाडी आता सिकंदराबाद येथून सोडण्यात येते. भुसावळ-मनमाड-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस आता अमरावतीपर्यंत वाढवण्यात आली. मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस करोना काळापासून बंद करण्यात आली. त्यानंतर पर्यायी गोदावरी म्हणून मनमाड-मुंबई उन्हाळी विशेष गाडी सुरू करण्यात आली. नंतर ही गाडी तीन दिवस मनमाडहून तर तीन दिवस धुळे येथून धावत होती. ही गाडी देखील आता धुळे -मुंबई अशी करण्यात आली आहे. मनमाड-मुंबई राज्यराणी एक्सप्रेस सुरू करण्यात आली. नंतर ती नांदेड-मुंबई करण्यात आली. ज्या ज्या गाड्या मनमाडहून सोडण्यात येत होत्या, त्या सर्व गाड्या रेल्वे प्रशासनाने पळविण्याचे धोरण अवलंबले आहे. मनमाड -सिकंदराबाद अजंता एक्स्प्रेसच्या बाबतीतही हेच होत आहे. भविष्यात मनमाड -मुंबई पंचवटी एक्स्प्रेसही अन्य ठिकाणाहून सोडली गेल्यास आश्चर्य वाटायला नको, असा सूर उमटत आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajanta express connecting south india will depart from bhusawal amy