नाशिक – राज्यात याआधी अनेक मराठा समाजाचे राजकारणी नेते झाले. त्यांची मानसिकता सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची होती. एकमेकांना विश्वासात घेतले जात होते. आता मात्र तसे होत नाही. आम्ही आरक्षणासाठी कोणाशी भांडत नाही. ओबीसी आरक्षणातील घुसखोरीविषयी सरकार काही करत नसल्याने आम्ही न्यायालयात गेलो, अशी भूमिका मांडत अन्न व ग्राहक सुरक्षा मंत्री तथा ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली.

येथे पत्रकारांशी संवाद साधताना भुजबळ यांनी राधाकृष्ण विखे आणि मनोज जरांगे यांची भेट कुठल्या कारणासाठी झाली हे माहिती नसल्याचे सांगितले. मराठा आरक्षणाविषयी जो काही आदेश निघाला, तेव्हांपासून १४ ते १५ आत्महत्या झाल्या असतील. या निर्णयामुळे आरक्षण संपले असल्याचा अनेकांचा समज झाला आहे. याआधी अनेक मराठा समाजाचे राजकारणी झाले. त्यांची मानसिकता सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची होती. आता हे काय चाललंय, असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला.

ओबीसींमध्ये १७४ जाती आहेत. कुठल्याही एका जातीसाठी आम्ही लढत नाही. विधानसभा निवडणुकीवेळी ओबीसी आमचा डीएनए असे सांगितले गेले होते. आता त्यांना कितपत आवश्यकता आहे, माहिती नाही, असा टोला भुजबळ यांनी भाजपला हाणला. मराठा समाजाने वेगळे आरक्षण घ्यावे, हे आमचे म्हणणे आहे. खोटी प्रमाणपत्रे घेतली जात आहेत. जाती जातींमध्ये घुसखोरी होत आहे. त्यांना वेगवेगळ्या संघटना विरोध करत आहेत. असे होत असेल तर आरक्षणाला धक्का कसा लागत नाही, असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला. बीडमध्ये होणारा मोर्चा हा सकल ओबीसी समाजाचा आहे. त्यामध्ये मराठा समाजाला लक्ष्य केले जाणार नाही, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.