जळगाव – राज्यभरातील जिल्ह्यांत शासन आपल्या दारी उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांत जेवढा खर्च होतो, तेवढाच खर्च कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी लागतो, असा राज्य सरकारला टोला लगावत गुळाला मुंग्या जशा चिकटून बसतात, तसे काही लोकं सत्तेला चिकटून असतात, अशी खोचक टीका अजित पवार गटावर माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमदार खडसे यांनी शहरातील मुक्ताई या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पाच सप्टेंबरला होणार्‍या जिल्हा दौर्‍याबाबत माहिती दिली. त्यांनी शिंदे-फडणवीस-पवार यांच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. याप्रसंगी पक्षाचे नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी आदी उपस्थित होते. आमदार खडसे यांनी राज्यभरात शिंदे- फडणवीस-पवार सरकारच्या शासन आपल्या दारी उपक्रमावर शेलक्या शब्दांत टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत कार्यक्रम होत आहेत. त्यासाठी जो खर्च केला जात आहे, तेवढ्याच खर्चात राज्यात कृत्रिम पाऊस पाडून दुष्काळी परिस्थितीवर मात करता येईल, असा खोचक सल्ला त्यांनी दिला.

हेही वाचा – नाशिक दुष्काळाच्या छायेत, पिके करपली; धरणसाठा केवळ पिण्यासाठीच, सिंचनासाठी पाणी मिळणे धूसर

२०१४ मध्ये आपण महसूलमंत्री असताना राज्यभरात कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविला होता, तो यशस्वी झाला होता. सद्यःस्थितीत पावसाअभावी अनेक भागांत दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्याचा दोन तृतीयांश भाग हा दुष्काळसदृश आहे. अनेक भागांत उडीद, मूग गेल्यात जमा आहे. पाऊस नसल्यामुळे पिके कशी जगवावीत, असा प्रश्‍न शेतकर्‍यांपुढे आहे. सद्यःस्थिती पिके जगवायची असतील, तर कृत्रिम पावसाची आवश्यकता आहे, असे सांगत सरकारने शासन आपल्या दारी उपक्रम राबविण्याऐवजी कृत्रिम पाऊस पाडावा, असा सल्ला आमदार खडसे यांनी दिला आहे.

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर अजित पवार यांच्यासोबत काही नेते सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यावरही खडसे यांनी भाष्य करीत जोरदार हल्लाबोल केला. अजित पवार यांच्यासोबत नेते आहेत, तर कार्यकर्ते आणि जनता शरद पवारांच्या सोबत आहेत, हे राज्यभरात एकंदरीत चित्र आहे. जिकडे सत्ता असली तिथे स्वाभाविकपणे ओढा असतो. गुळाला मुंग्या चिकटून बसतात, त्याप्रमाणे काही लोक सत्तेला चिकटून बसतात. स्वाभाविक आहे जिथे सत्ता आहे, तिथे जातात. प्रलोभन असते, काही भीती असते आणि अन्य कारणेही असू शकतात. त्यामुळे असे काही लोकं सत्तेकडे जातात. उद्या आमच्या हातात आल्यास गेलेल्यांपैकी ९० टक्के लोक आमच्याकडे परत येतील, असा टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा – बहुचर्चित १५ खाणपट्टाधारकांचे वाहतूक परवाने बंद, जिल्हा प्रशासनाचा निर्णय

शरद पवारांची पाच सप्टेंबरला जाहीर सभा

आमदार खडसे म्हणाले की, पक्षाचे संस्थापक शरद पवार हे पाच सप्टेंबरला जिल्हा दौर्‍यावर येणार आहेत. तत्पूर्वी, दोन सप्टेंबरला आमदार रोहित पवार, आर. आर. आबा पाटील यांचे चिरंजीव युवक प्रदेशाध्यक्ष रोहित पाटील हे संवाद यात्रेनिमित्त जळगावात येणार आहेत. आमदार रोहित पवार, रोहित पाटील हे जिल्ह्यातील ग्रामीण भागात संवाद यात्रेनिमित्त युवकांशी संवाद साधून समस्या, प्रश्‍न जाणून घेणार आहेत. दोन व तीन सप्टेंबरला ते जळगाव जिल्ह्यात, तर चार सप्टेंबरला ते धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांत जाणार असून, तेथील युवकांशी संवाद साधणार आहेत. पुन्हा पाच सप्टेंबरला आमदार रोहित पवार व रोहित पाटील हे जळगावात येणार आहेत. शरद पवार यांच्या जळगावातील जाहीर सभेला उपस्थित राहतील. त्यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड, जयदेवराव गायकवाड यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेतेही येणार आहेत. सभेची जोरदार तयारीही सुरू आहे. सागर पार्क मैदानावर दुपारी जाहीर सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, मुंबई येथे शरद पवार यांच्यासोबत होणार्‍या बैठकीत नियोजन झाल्यानंतर मिनीट टू मिनीट कार्यक्रमांबाबत सांगण्यात येईल, असे ते म्हणाले

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath khadse advice to shinde fadnavis government says instead of shasan aplya dari government should use artificial rain to save the crops ssb