धुळे : महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला वाळीत टाकले जात असल्याने अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी वेगळी भूमिका घेण्याचा इशारा देतानाच धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डाॅ. सुभाष भामरे यांच्या प्रचारात सहभागी होण्यास कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला. राष्ट्रवादीचे मंत्री अनिल पाटील यांच्या समोरच हे नाराजी नाट्य घडले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी येथे राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित आढावा बैठकीत महायुतीतील विसंवाद उघड झाला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे उमेदवार खा. डॉ. सुभाष भामरे यांच्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.

कार्यक्रमांमध्ये डावलले जात असल्याचा आरोप केला. खासदार पत्र देऊन आमची कामे रद्द करतात. स्वतःचे महत्व टिकवण्यासाठी आम्हाला डावलले जाते. नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेच पाहिजेत, परंतु महायुतीत आम्हाला वाळीत टाकले जात असेल तर वेगळी भूमिका घ्यावी लागेल, असे इशारा संतप्त कार्यकर्त्यांनी दिला. मंत्री पाटील यांनी कार्यकर्त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला. खासदार भामरे यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आल्याने भाजपमधील उमेदवारीसाठी इच्छुक असलेले अनेक जण नाराज आहेत. पक्षांतंर्गत नाराजीला तोंड देत असतानाच भामरे यांना आता मित्रपक्षांच्या रोषालाही तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचे दिसत आहे.

हेही वाचा : लाभार्थी संपर्क अभियानाद्वारे भाजपची घरोघरी प्रचाराची रणनीती, विरोधकांचे आक्षेप खोडण्याची धडपड

अक्कलपाडा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरावे आणि लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी मिळायला हवे, आम्हालाही विचारात घेतले जावे, असे मत बैठकीत मांडले. भाजपच्या शहर आणि ग्रामीण पदाधिकाऱ्यांबाबतही भूमिका मांडण्यात आली. शिष्टाचार पाळला जात नाही, असे काहींनी सांगितले. खासदार भामरे यांना विरोध केला वगैरे, असे काही माझ्यासमोर घडले नाही.

किरण शिंदे (समन्वयक, महायुती)