जळगाव : जिल्ह्यात अनेक ठिकाणी बुधवारी रात्री वादळी पाऊस झाला. वेगवेगळ्या घटनेत महिलेसह दोन पुरूषांचा मृत्यू झाला. वादळामुळे मुंबईहून आलेले विमान उतरविण्यास अडचण आल्याने मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांनाही त्याचा फटका बसला. ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने आणि खांब वाकल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प होऊन वीज पुरवठा खंडित झाला.

जळगाव जिल्ह्यात बुधवारी रात्री आठनंतर अचानक सुरू झालेल्या वादळी पावसामुळे चिंचेच्या झाडाखाली उभ्या असलेल्या प्रियानी बारेला (३४) या आदिवासी महिलेचा पळासखेडा मिराचे येथे झाडाखाली दबून जागीच मृत्यू झाला. झाडाच्या आडोशाला उभे असलेले इतर १५ जण जखमी झाले. याशिवाय, राणीचे बांबरुड (ता.पाचोरा) येथील पितांबर वाघ (५०) यांचा वीज पडून तसेच फरकांडे (ता. एरंडोल) येथील नारायण पाटील (६८) यांचा उडालेली पत्रे लागून मृत्यू झाला. जळगाव शहरातील मेहरूणमध्ये वीज कोसळल्याने संतोष तायडे यांची गाय मृत्युमुखी पडली. झाडे कोसळल्याने अनेक ठिकाणी चारचाकी, दुचाकी वाहनांचे नुकसान झाले. काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडाले.

जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील वाहतूक आणि वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत ठप्प होता. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी रात्रीच नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन ठप्प झालेली वाहतूक व वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित यंत्रणेला मदत केली. त्यामुळे मध्यरात्रीनंतर रखडलेली वाहतूक तसेच काही भागातील वीज पुरवठा सुरळीत झाला. प्रशासनाकडून वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास गुरूवारी सकाळपासून सुरूवात करण्यात आली.

विमान न उतरल्याने दोन्ही मंत्री मुंबईत परत

नियोजित दौरा कार्यक्रमानुसार, भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन तसेच शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे बुधवारी सायंकाळी ०७.१० वाजता मुंबई येथून विमानाने जळगावकडे प्रयाण करणार होते. रात्री साधारण ०८.२५ वाजता जळगाव विमानतळावर त्यांचे आगमन होणे अपेक्षित होते. मात्र, त्याचवेळी जळगाव विमानतळाच्या परिसरात दोन-तीन वेळा वीज कोसळल्याने यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे मुंबईहून आलेले विमान जळगाव येथे न उतरताच परत मुंबईला माघारी फिरले. त्यामुळे मंत्री महाजन आणि पाटील यांचे गुरुवारी जळगाव जिल्ह्यात नियोजित कार्यक्रम रद्द करावे लागले. बिघडलेली यंत्रणा युद्ध पातळीवर प्रयत्न करून नंतर दुरूस्त करण्यात आल्याने हैद्राबादहून आलेले एक विमान जळगावात रात्री उतरले.