नाशिक: मध्य रेल्वेच्या देवळाली ते लहवीत स्थानकादरम्यान शुक्रवारी पहाटे ओव्हडहेड वायर तुटल्याने नाशिकहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक पूर्णत विस्कळीत झाली. लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वेगाड्या थांबवून ठेवण्यात आल्या. चाकरमान्यांची भिस्त असणारी पंचवटी व राज्यराणी एक्स्प्रेसलाही दोन तास विलंब झाला. यामुळे प्रवाशांसह मुंबईला दैनंदिन ये-जा करणाऱ्या नोकरदारांचे प्रचंड हाल झाले.
रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे पहाटेपासून नाशिकरोड, मनमाड रेल्वे स्थानकांवर प्रवासी ताटकळत होते. रेल्वेचे पथक युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करीत असून लवकरच नाशिक-मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतूक सुरळीत होईल, असा दावा रेल्वे अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता देवळाली-लहवीत रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीवर विपरित परिणाम झाला. अनेक गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी थांबवण्यात आल्या. १२६१८ मंगला एक्सप्रेस तेथून जात असताना ही घटना घडली.
रेल्वे अधिकाऱ्यांनी डिझेल इंजिन वापरून ही रेल्वे पुढे इगतपुरीकडे नेली. यामुळे तिला एक तास विलंब झाला. नाशिकरोड रेल्वे स्थानकावर पहाटेपासून अडकलेल्या १२१०२ ज्ञानेश्वरी एक्स्प्रेससह अन्य गाड्यांना नाशिकरोडवरून सकाळी साडेसात वाजता प्रवास सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना करीत मुंबईहून-नाशिककडे येणाऱ्या मार्गावरून म्हणजे विरुद्ध मार्गाने अडकलेल्या काही गाड्यांना पुढे नेण्यात आल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. नाशिकरोड स्थानकात हटिया – एलटीटी एक्स्प्रेस देखील अडकलेली होती. याशिवाय १७६११ राज्यराणी, १२११० मनमाड – मुंबई पंचवटी एक्स्प्रेस आणि या मार्गावर धावणाऱ्या इतर महत्त्वाच्या गाड्या दीड ते दोन तास उशिराने धावत असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
नाशिकरोड रेल्वे स्थानकात ताटकलेल्या प्रवाशांना कुठलीही माहिती दिली गेली नसल्याची संतप्त प्रतिक्रिया प्रवासी वर्गातून व्यक्त झाली. वाहतूक विस्कळीत झाल्याने रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झालेली होती. सकाळी साडेसहा वाजेपासून अनेक प्रवासी राज्यराणी व पंचवटी एक्स्प्रेसच्या प्रतिक्षेत होते. या गाड्यांना किती विलंब होणार, याची कुठलीही माहिती दिली गेली नसल्याची तक्रार संबंधितांकडून करण्यात आली.