लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या भूमिकेमुळे शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव झाल्याची तक्रार करुन देवळाली विधानसभा मतदारसंघ आपल्या पक्षाच्या दृष्टीने कसा महत्वाचा आहे, याकडे लक्ष वेधणारे माजी खासदार, माजी मंत्री आणि पदाधिकाऱ्यांची खासदार श्रीकांत शिंदे यांनी हजेरी घेतली. लाडकी बहीणसह इतर शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कोणी काय काम केले, अशी उलट तपासणी खासदार शिंदे यांनी घेतली. विधानसभा निवडणूक महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्रितपणे लढतील आणि जागा वाटपाचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

उत्तर महाराष्ट्रात जनसंवाद दौऱ्यांतर्गत शुक्रवारी खासदार शिंदे यांनी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी शिंदे यांचे स्वागत केले. बैठकीत माजी खासदार हेमंत गोडसे. माजीमंत्री बबन घोलप, विजय करंजकर आदींनी लोकसभेतील पराभवास राष्ट्रवादी अजित पवार गटाला जबाबदार धरल्याचे सांगितले जाते. देवळाली या अजित पवार गटाच्या मतदारसंघावर संबंधितांनी दावा सांगण्याचा प्रयत्न केला. या मतदारसंघासंदर्भातील बैठक एक ते दीड तास चालली. शिंदे यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर लाडकी बहीणसह अन्य योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कोणी काय काम केले, किती महिलांकडून, लाभार्थ्यांकडून अर्ज भरून घेतले, याची विचारणा केल्यावर अनेकांना मौन धारण करावे लागले. बैठकीनंतर या संदर्भातील प्रश्नावर शिंदे यांनी महायुतीत तीन पक्ष असल्याने कार्यकर्त्यांना एखादी जागा आपण लढली पाहिजे, पक्ष वाढला पाहिजे, असे वाटणे स्वाभाविक असल्याचे सांगितले. महायुतीत तिन्ही पक्ष एकत्र काम करतात. जागेबाबत वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, त्या अनुषंगाने तिन्ही पक्ष समन्वय राखून काम करतील, असे त्यांनी सूचित केले. जागा वाटपाचे सूत्र सांगण्याचे त्यांनी टाळले.

आणखी वाचा-विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी धुळ्यातील सर्व ठाण्यांमध्ये आता पोलीस दादा, पोलीस दीदी

राष्ट्रवादी अजित पवार गटाविषयी शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत शिंदे यांनी भाष्य करताना विधानसभा निवडणूक तिन्ही पक्ष एकत्रित लढतील आणि पुन्हा महायुतीची सत्ता येईल, असा दावा केला. राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याची दुर्घटना, बदलापूर प्रकरण यात विरोधी पक्षांना केवळ राजकारण करायचे आहे. लोकसभा निवडणुकीत गैरसमज पसरविण्याचे काम त्यांनी केले. तथापि, विधानसभेत तसे होणार नाही. या भीतीपोटी त्यांचे राजकारण सुरू आहे. राज्य शासनाच्या योजनांना जनतेचा मिळणारा प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचा आरोप त्यांनी केला. ठाकरे सरकारने विकासात्मक, लोकोपयोगी कामे केली नाहीत. समृध्दी महामार्गाला विरोध केला. मेट्रोसह अनेक प्रकल्पांत खो घातला, असा आक्षेपही त्यांनी नोंदवला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What work done for ladaki bahin yojana shrikant shinde ask to office bearers mrj