नवी मुंबई – बेलापूर येथील सिडको भवन या कार्यालयात सोमवारी नावडे व रोडपाली गावचे ४० ग्रामस्थांनी शिरून सरकारी कार्यालयात गोंधळ घातल्याने बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेनंतर सिडको भवनाच्या सूरक्षाविषयी प्रश्न उपस्थित होत आहे. सिडकोच्या सूरक्षा विभागाने याविषयी बेलापूर पोलीस ठाण्यात संबंधित ग्रामस्थांच्या विरोधात गुन्हा नोंदवला.
रोडपाली आणि नावडे या गावांमधील ग्रामस्थांनी सोमवारी अचानक आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने सिडकोच्या सूरक्षा यंत्रणेची पुन्हा भंबेरी उडाली. संतापलेल्या महिला व पुरुषांनी एकत्र येऊन सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांच्या दालनाबाहेरील मोकळ्या जागेवर एकत्र जमून सिडकोच्या कारभाराविषयी जोरदार संताप व्यक्त केला. अचानक जाब विचारण्यासाठी आलेल्या या ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला शांत करण्याचा सिडकोच्या सूरक्षा यंत्रणेने प्रयत्न केला. मात्र त्याचा फारसा लाभ झाला नाही.
१९८० साली या ग्रामस्थांची जमीन सिडकोने संपादित केल्यावर शेतक-यांना नूकसान भरपाई म्हणून दिले जाणारे साडेबारा टक्के भूखंड योजनेतील २०१९-२० साली सेक्टर ४५ येथे भूखंड देण्यात आले. मात्र काही मोजके शेतक-यांना भूखंड दिल्यानंतर इतर शेतक-यांना भूखंडाचे वाटप नंतर करू असा पवित्रा सिडकोने घेतला. मात्र अनेक वर्षां नंतरही भूखंड न दिल्याने नावडे व रोडपाली गावच्या महिला व पुरुष शेतकरी सिडकोत शिरले.
या अचानक पुकारलेल्या आंदोलनातर सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक देशमुख यांनी शेतक-यांना शांत केल्यानंतर त्यांच्यासोबत चर्चा केली. पुढील दोन महिन्यात शेतक-यांच्या साडेबारा टक्के योजनेतील भूखंड देण्याची कार्यवाही करणार असल्याचे आश्वासन त्यांनी शेतक-यांना दिले. मात्र देशमुख यांच्या कारकिर्दीत गेल्या अनेक वर्षे रखडलेले साडेबारा टक्के योजनेतील भूखंड वाटप सर्वाधिक करूनही शेतक-यांनी कोणतीही कल्पना न देता अचानक आंदोलनाचा पवित्रा घेतल्यामुळे नाराजी व्यक्त केली.
