सांगली : महायुतीच्या देवेंद्र फडणवीस सरकारला पाच आमदारांचे जिल्ह्याने बळ देउनही मंत्रीपदापासून वंचित राहिलेल्या सांगली जिल्ह्याचे पालकत्व कोणत्या पक्षाकडे जाते याची उत्सुकता जिल्ह्याला लागली आहे. मातब्बर नेत्यांची मांदियाळी लाभलेला हा जिल्हा आता अन्य जिल्ह्यातील नेत्यांच्या हवाली होणार असला तरी पालकमंत्री कुणाला करायचे यापेक्षा कुणाला नको यासाठीच महायुतीतील नेतेमंडळी प्रयत्नशील असल्याचे समजते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्ह्यातील आठ जागापैकी वाळवा, पलूस-कडेगाव आणि तासगाव-कवठेमहांकाळ हे तीन मतदार संघ वगळता महायुतीने पाच जागा जिंकल्या. यापैकी खानापूर वगळता अन्य चार ठिकाणी भाजपचे आमदार निवडून आले. लोकसभा निवडणुकीत भाजपचा झालेला पराभव महायुतीने विधानसभा निवडणुकीत धुउन काढला. विजयी झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचे मताधिक्य कमी ठेवण्यात महायुती यशस्वी ठरली. भरभक्कम पाठबळ मिळाले असून सुध्दा मंत्रीमंडळात सांगली जिल्ह्याला स्थान मिळाले नाही. यामुळे महायुतीतील भाजपच्या स्थानिक नेत्यामध्ये अस्वस्थता आहे. त्यात विधानसभा निवडणुका होउन महिना झाला तरी अद्याप जिल्ह्याचे पालकत्व कुणाकडे याची उत्सुकता कायम आहे.

हे ही वाचा… विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा अव्वल

सांगलीला शेजारच्या जिल्ह्यातून पालकमंत्री दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात असून यामध्ये चंद्रकांत पाटील, जयकुमार गोरे यांची नावे भाजपच्या गोटातून, शिवसेनेतून शंभूराजे देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटातून हसन मुश्रीफ यांचे नावही चर्चेत आहे. यापुर्वी मंत्री पाटील यांनी एकवेळ सांगलीचे पालकत्व केले आहे. मात्र, यावेळी त्यांचे लक्ष प्रामुख्याने पुण्यावर असल्याने त्यांची पहिली पसंती पुण्याला आहे. तरीही जिल्ह्यात त्यांचा असलेला संपर्क पाहता काही स्थानिक नेते त्यांच्याकडे पालकत्व जावे यासाठी प्रयत्नशील आहेत, तर काही विद्यमान आमदारांनी त्यांच्याकडे पालकत्व देण्यास विरोध दर्शवला आहे.

जर सांगलीचे पालकत्व शिवसेना (शिंदे) पक्षाकडे देण्याची वेळ आलीच तर प्रामुख्याने शंभूराज देसाई यांचे नाव प्राधान्याने घेतले जात आहे. त्यांचा खानापूर, तासागावशी निकटचा संबंध असून त्यांची सासरवाडी तासगाव तालुक्यात आहे. तर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या वाट्याला सांगली जिल्हा आला तर कोल्हापूरचे हसन मुश्रीफ यांच्याकडे जिल्ह्याचे पालकत्व जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर मंत्री जयकुमार गोरे यांचे सांगलीशी निकटचा संपर्क असून त्यांचा अलिकडे राबताही वाढला आहे. यामुळे त्यांनाही पालकत्व मिळू शकते असा दावा केला जात आहे. यातूनच त्यांच्या उपस्थितीत एका शासकीय कार्यक्रमाचे आयोजन सांगलीत करण्यात आले होते. मात्र, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे हा कार्यक्रमच स्थगित करण्यात आला होता. याकडेही गोरे समर्थक लक्ष वेधत आहेत.

हे ही वाचा… Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांचा ‘पीडीए’ फॉर्म्युला २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत चालणार का? ‘सपा’ने सुरु केली मोठी मोहीम

जिल्ह्याचा पालक मंत्री नियोजन मंडळाचा पदसिध्द अध्यक्ष असल्याने निधी वाटपात महत्वाचे ठरतात. याशिवाय विविध समिती नियुक्तीमध्ये पालकमंत्री महत्वाचे असल्याने राजकीय लाभाची पदे देण्यात पालकमंत्री महत्वपूर्ण ठरतात. यामुळे जिल्ह्याचे पालकत्व कुणाकडे जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Despite the strength of five maha yuti mla from sangli district no minsitership post print politics news asj