Maharashtra Municipal Elections 2025 : राज्यात गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळविल्यानंतर भाजपाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. आगामी काळात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. मुंबई, ठाणे व पुणे यांसारख्या महत्वाच्या शहरांमध्ये भाजपा स्वबळावर निवडणुका लढविण्याचा पर्याय तपासत असल्याची माहिती आहे. मुंबई महापालिकेवर गेल्या तीन दशकांपासून वर्चस्व गाजविणाऱ्या शिवसेनेत उभी फूट पडल्याने ठाकरे गटाची ताकद कमी झाल्याचं दिसून येत आहे. दुसरीकडे, शिवसेना ताब्यात घेणाऱ्या एकनाथ शिंदेंनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांचा ठाणे बालेकिल्ला शाबूत ठेवला आहे. मात्र, भाजपाने पुण्यात व ठाण्यात स्वबळावर निवडणूक लढविण्याचे संकेत दिल्याने शिंदे-पवारांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार, शिवसेना (एकनाथ शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे दोन्ही पक्ष त्यांच्या प्रभाव क्षेत्रातील जास्तीत जास्त जागांची मागणी करीत आहेत. त्यामुळेच महायुतीत जागवाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपाचे वरिष्ठ नेते या तिढ्याकडे गांभीर्याने पाहत आहेत. त्यामुळेच भाजपाने या तिन्ही शहरांमधील निवडणुका स्वबळावर तयारी दर्शविली आहे. अमित शाह यांनी नुकत्याच केलेल्या महाराष्ट्र दौऱ्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठक घेऊन जागावाटपासंदर्भात चर्चा केली. मात्र, या चर्चेतून काहीही तोडगा निघाला नसल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

शिंदे गटाने किती जागांची मागणी केली?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महायुतीत जागावाटपावरून तिढा निर्माण होत असल्याने अमित शाह यांनी मुंबई, पुणे व ठाणे या तिन्ही उच्चस्तरीय शहरांमध्ये स्वबळावर निवडणुका लढवण्यास तयार राहण्याचा सल्ला भाजपा नेत्यांना दिला आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईतील २२७ जागांपैकी किमान १०७ जागांची मागणी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही मागणी करताना त्यांनी अमित शाह यांना यामागचं ठोस कारणही सांगितलं आहे. मागील दोन-तीन वर्षांत शिवसेना ठाकरे गटातील १०० हून अधिक माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या सर्वांना महापालिकेची उमेदवारी देण्याचे आश्वासन दिल्याने एकनाथ शिंदेंवर असल्याची माहिती आहे.

आणखी वाचा : स्वातंत्र्यवीर सावरकर राजकारणाच्या केंद्रस्थानी पुन्हा का येत आहेत?

भाजपाचे स्वबळावर निवडणुका लढविण्याचे प्रयत्न?

मुंबई महापालिकेतील २२७ जागांपैकी १०७ जागा शिंदे गटासाठी सोडणे भाजपासाठी फायदेशीर ठरणारे नाही. कारण, आरपीआयसारखे घटकपक्षही त्यांच्याकडे जास्तीत जास्त जागांची मागणी करू शकतात. ठाण्यातही एकनाथ शिंदेंनी भाजपाकडे सर्वाधिक जागांची मागणी केली आहे. त्यामुळे भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाला शिंदेंचा हा प्रस्ताव मान्य नाही, असंही सूत्रांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे, मागील मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाने स्वबळावर ८२ जागा जिंकून सर्वांनाच आश्चर्यचकित करून सोडलं होतं. या निवडणुकीत अधिकाधिक जागांवर उमेदवार उभे करून मुंबई महापालिका ताब्यात घेण्याचे भाजपाचे प्रयत्न असतील. मुंबईपाठोपाठ शिंदेंचा पारंपारिक बालेकिल्ल्यातही स्वबळावर निवडणूक लढवून कमळ फुलविण्याचे भाजपा नेत्यांचे प्रयत्न असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

पुण्यात अजित पवार सर्वाधिक जागांसाठी आग्रही

दरम्यान, शिंदे गटापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही महायुतीत सर्वाधिक जागांची मागणी केल्याची माहिती आहे. पुण्याचे पालमंत्री असलेल्या अजित पवारांनी जिल्ह्यात सर्वाधिक जागा आपल्याच पक्षाच्या सोडण्यात याव्यात, असा आग्रह अमित शाहांकडे धरला असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला म्हणून पुणे जिल्ह्याची ओळख आहे. त्यातच शहरात पक्षाकडे कार्यकर्त्यांचे संख्याबळ अधिक असल्याने अनेकजण नगसेवकपदाच्या उमेदवारी उत्सुक असल्याचं कळतंय. मुंबईत राष्ट्रवादीची पाळमुळं भक्कम नसल्याने तिथे आम्हाला कमी जागा दिल्या तरी चालतील, अशी अट अमित शाहांकडे ठेवली असल्याची माहिती आहे.

महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय?

जागावाटपाच्या वाटाघाटी अधिक गुंतागुंतीच्या ठरत असल्याने महायुतींच्या नेत्यांसमोर मोठा पेच उभा राहिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अमित शाह यांनी या गुंतागुंतीवर तोडगा काढण्यासाठी एक नवीन भूमिका मांडली आहे. ती म्हणजे, मुंबई, ठाणे आणि पुणे यांसारख्या प्रमुख शहरात तिन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढवाव्यात. उर्वरित शहरांमध्ये राजकीय परिस्थितीनुसार युतीचा विचार करावा. ही भूमिका राज्यातील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनाही कळविण्यात आल्याची माहीती आहे. त्यानुसार, फडणवीस यांनीही होकार भरला असून काही मतदारसंघांमध्ये भाजपाला स्वयंपूर्णतेकडे लक्ष द्यावे लागेल, असे मान्य केले आहे.

हेही वाचा : भाजपाच्या मंत्र्याचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; सरकार अडचणीत? नेमकं काय आहे प्रकरण?

निवडणुकीत भाजपाचा मोठा फायदा होणार?

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यांत घेण्याचे निर्देश दिले आहेत, त्यामुळे पावसाळ्यात किंवा पावसाळ्यानंतर राज्यात निवडणुकांचा रणसंग्राम रंगण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या निवडणुकांसाठी सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही गटांनी तयारी सुरू केली असताना, भाजपाने नव्याने आखलेली रणनीती महाराष्ट्रातील शहरी राजकारणात नव्या पर्वाची नांदी ठरू शकते, असं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत. एकीकडे महायुतीचे नेते आगामी निवडणुकीची रणनीती ठरवित असताना दुसरीकडे महाविकास आघाडीत दुफळी निर्माण होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास भाजपाला मोठा राजकीय फायदा होईल, असं भाकीत राजकीय विश्लेषकांनी वर्तविलं आहे.