राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला. “सध्या राज्यात सरकार आहे पण शासन नाही” असं ते म्हणाले. याचबरोबर, “कुणावर कारवाई करावी आणि कुणावर नाही, हा प्रश्न सरकारपुढे आहे. ज्यांनी आरोप केले, त्यांच्यावर कारवाई केली. पण, ज्यांच्या-ज्यांच्यावर आरोप झाले, त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याची हिंमत दाखवा! असं फडणवीसांनी बोलून दाखवलं आहे.” असं देखील फडणवीसांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“…पुणेकर त्याला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही” ; फडणवीसांचं विधान!

पुणे शहर भाजपाच्या नवीन वास्तूतील मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज झाले. यावेळी फडणवासांशी माध्यमांनी संवाद साधला.

माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, “सध्या राज्यात सरकार आहे पण शासन नाही. कुठल्याही प्रकारचे लक्ष्य नाही. शेतकरी, शेतमजूर किंवा गरीब, मागासवर्यी असो, शहर किंवा गाव कुठेही कुठलही नवीन काम होताना आपल्याला दिसत नाही. जनतेसाठी कुठलंही लक्ष्य दिसत नाही. मोठ्याप्रमाणात वीज कनेक्शन कापणं असेल किंवा पेट्रोल-डिझेलवरचा कर हा सगळ्या राज्यांनी कमी केल्यानंतर महाराष्ट्र एकमेव राज्य आहे की ज्याने तो कमी केला नाही. महाराष्ट्राने दारूवरचा कर कमी केला, पण पेट्रोल-डिझेलवरचा कर कमी केलेला नाही. त्यामुळे मला असं वाटतं की इथे कुठलही शासन नाही.”

महाराष्ट्रातील उद्योग कोणी कुठं नेऊ शकत नाही, पण –

तसेच, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीसांनी “मी देखील पाच वर्षे मुख्यमंत्री होतो, महाराष्ट्रात वेगवेगळ्या राज्याचे मुख्यमंत्री येतात. ते कारण, मुंबई ही एक आर्थिक राजधानी आहे. उद्योजकांशी ते चर्चा करतात, पण त्यामुळे उद्योग जातीलचं असं नाही. मागील काळात ते गेले नाहीत. मात्र जेव्हा जेव्हा यापूर्वी कुठल्याही राज्याचे लोक यायचे, त्यावेळी हेच आताचे सत्तारूढ पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना महाराष्ट्रातील उद्योग पळवण्यासाठी आले म्हणून कांगावा करायचे. आता मात्र तेच ममता बॅनर्जींचं या ठिकाणी स्वागत करत आहेत. माझं स्पष्ट मत आहे महाराष्ट्रातील उद्योग कोणी कुठं नेऊ शकत नाही. पण ज्याप्रकारचं शासकीय अपयश आता आपल्याला दिसत आहे. असं शासकीय अपयश राहीलं तर मात्र महाराष्ट्रामधील उद्योग बाहेर जातील. ” असेही यावेळी सांगितले.

जे खरे आरोपी आहेत, त्यांच्यावर कारवाई करायला सरकार मागेपुढे पाहत आहे –

याचबरबोर महाविकासआघाडी सरकारवर टीका करताना, “मला असं वाटतं की हे गोंधळलेलं सरकार आहे. कोणावर कारवाई करावी, कुणावर करू नये असा त्यांच्यासमोर सातत्याने प्रश्न आहे. मूळात जे खरे आरोपी आहेत, त्यांच्यावर कारवाई करायला सरकार मागेपुढे पाहत आहे. परमबीर सिंग यांच्यावर त्यांनी केलेली जी कारवाई आहे, त्या संदर्भात मी एवढंच सांगेन की जशी तुम्ही त्यांच्यावर कारवाई केली. तसं ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप झाले आहेत, त्यांच्यावर कारवाई करायला तुम्ही मागेपुढे का पाहत आहात? तशीच त्यांच्यावरही कारवाई करून दाखवण्याची तुम्ही हिंमत दाखवा. नाही तर तुमच्या सरकारविरुद्ध जो बोलतो त्यावर कारवाई कराल आणि तुमच्या सरकारमधील जे भ्रष्टाचारी आहेत, त्यांना मात्र वाचवाल हे योग्य नाही.” असंही यावेळी फडणवीस यांनी बोलून दाखवलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Currently there is a government in the state but no governance fadnavis hit the target msr
First published on: 03-12-2021 at 20:23 IST