पिंपरी : टाळ-मृदंगाचा गजर, विणेचा झंकार आणि ‘जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल’ नामाचा जयघोष अशा भक्तिरसाने परिपूर्ण वातावरणात, ‘ज्ञानोबा-तुकोबा’च्या जयघोषात श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आषाढी वारीसाठी बुधवारी देहूतून प्रस्थान ठेवले. संपूर्ण देहूनगरी प्रस्थान सोहळ्यामुळे भक्तिचैतन्यात दंग झाली होती. पालखीचा पहिला मुक्काम देहूतच इनामदारवाड्यात आहे.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य भाविक पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी देहूत दाखल झाले आहेत. यंदा पालखी सोहळ्याचे ३४० वे वर्ष आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तुकोबांच्या पादुकांची पूजा करण्यात आली.

प्रथेनुसार पालखी सोहळ्यास मुख्य मंदिरात पहाटे साडेचार वाजता प्रारंभ झाला. पहाटे पाच वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात संस्थानाचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा झाली. संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात गणेश महाराज मोरे, विक्रमसिंह महाराज मोरे, लक्ष्मण महाराज मोरे यांच्या हस्ते महाअभिषेक झाला. विठ्ठल-रुक्मिणी मातेची महापूजा करण्यात आली. पालखी सोहळ्याचे जनक, तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात उमेश महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.

देहूकर महाराज यांचे सकाळी दहा वाजता पालखी प्रस्थान सोहळा सप्ताहातील काल्याचे कीर्तन झाले. देऊळवाड्यातील भजनी मंडपात दुपारी अडीच वाजता पालखी प्रस्थान सोहळा प्रमुख कार्यक्रमास प्रारंभ झाला. या वेळी आलेल्या दिंड्यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. ब्रह्मवृंदाच्या उपस्थितीत मंत्रघोषात पादुकापूजन करण्यात आले. चांदीच्या सिंहासनावर, चांदीच्या ताटात, चांदीच्या पादुकांना अभिषेक करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पादुकांची पूजा करण्यात आली.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार श्रीरंग बारणे, सुनेत्रा पवार, आमदार सुनील शेळके, महेश लांडगे, शंकर मांडेकर, अमित गोरखे, उमा खापरे, राज्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, नगराध्यक्ष पूजा दिवटे या वेळी उपस्थित होते. दुपारी तीन वाजून ५८ मिनिटांनी पालखीने प्रस्थान ठेवले. प्रस्थान ठेवताच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये उत्साह संचारला.

मुख्यमंत्र्यांनी घेतला फुगडीचा आनंद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुमारे तासभर मंदिरात होते. पादुकांची पूजा झाल्यानंतर त्यांनी फुगडी खेळण्याचा आनंद घेतला. मंत्री मोहोळ, आमदार लांडगे, शेळके, गोरखे यांच्यासोबत फडणवीस यांनी फुगडी खेळली.

भक्तिरसाला उधाण

प्रस्थान सोहळा सुरू असताना मंदिराच्या प्रांगणात भक्तिरसाला उधाण आले होते. वरुणराजाने हजेरी लावली. त्यामुळे वारकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. महिलांनी, युवा वारकऱ्यांनी फुगड्यांचा फेर धरला. संस्थानातर्फे सत्कार सोहळा झाल्यानंतर विविधरंगी फुलांनी सजलेल्या पालखीत पादुका ठेवण्यात आल्या. त्या वेळी ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा जयघोष झाला.

दिंड्या थांबविल्यामुळे वारकरी आक्रमक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा आल्याने मंदिरात सोडण्यात येणाऱ्या दिंड्यांना थांबविण्यात आले. अश्वालाही आत सोडले नव्हते. त्यामुळे वारकरी आक्रमक झाले आणि त्यांनी पोलिसांचे सुरक्षाकडे तोडून मंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना पोलिसांनी रोखले.

‘वारकऱ्यांची सुरक्षा महत्त्वाची’

‘श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता आल्याने हा माझ्या जीवनातील अत्युच्च क्षण आहे. त्याचा अतिशय आनंद आहे. भागवत धर्म आणि वारकरी संप्रदाय यांनी शेकडो वर्षे आक्रमणातूनही देव, देश, संस्कृतीचे रक्षण केले आहे. भागवत धर्माचे रक्षण केले आहे. पोलिसांनी उत्तम व्यवस्था ठेवली आहे. एका वेळी सर्वांना सोडले, तर गोंधळ होईल. त्यामुळे टप्प्याटप्प्याने वारकऱ्यांना मंदिरात सोडले. वारकऱ्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. वारकरी तासभर थांबावे लागल्याची पर्वा करीत नाही. अनेक किलोमीटर पायी जाणारा वारकरी शिस्तीत दर्शन घेतो,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  • पालखी सोहळ्यात ५०० दिंड्यांचा सहभाग
  • यंदा वारकरी, भाविकांची मोठी गर्दी
  • रांगोळ्यांच्या पायघड्या, फुलांची सजावट अन् रोषणाई
  • पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
  • सोहळ्यावर सीसीटीव्हीची नजर
  • विविध सामाजिक संस्थांकडून अन्नदान