पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हाळी सुट्यांमुळे सध्या त्यात आणखी भर पडली आहे. तिकीट आरक्षित करूनही प्रवाशांना गर्दीमुळे गाडीत चढता येत नसल्याचे चित्र अनेक वेळा दिसत आहे. रेल्वे प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा दलाकडून गर्दीचे नियोजन केले जात नसल्याने स्थानकावर गोंधळाचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे विभागात सर्वाधिक प्रवासी संख्या पुणे स्थानकावर आहे. पुणे विभागातील प्रवाशांची संख्या एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत सुमारे साडेपाच कोटी होती. यातील जवळपास निम्मी म्हणजे सव्वादोन कोटी प्रवासी संख्या पुणे स्थानकावरील आहे. सध्या उन्हाळी सुट्यांचा हंगाम असल्याने रेल्वेकडून अनेक विशेष गाड्या सोडल्या जात आहेत. या गाड्या प्रामुख्याने उत्तरेकडे जाणाऱ्या आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. अनेक वेळा आधी तिकीट आरक्षित करून गाडीमध्ये चढता न आल्याचा अनुभव अनेक प्रवासी मांडत आहेत.

हेही वाचा : दिलासा; यंदा उत्तम पावसाचा अंदाज

पुणे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांकडून गर्दीचे नियोजन केले जाते. प्रत्यक्षात गाडी फलाटावर आल्यानंतर काही काळ हे जवान असतात. ते प्रवाशांच्या रांगा लावून निघून जातात. जवान निघून गेल्यानंतर गोंधळाला सुरुवात होते आणि प्रवासी एकदम गर्दी करून गाडीत घुसण्यास सुरुवात करतात. यामुळे अनेक प्रवाशांना तिकीट असूनही गाडीत बसता येत नाही. यामुळे त्यांना गाडी तिथून जाताना हताशपणे पाहावे लागते. अनेक विनातिकीट प्रवासी दमदाटी करून गाडीत घुसतात, असाही अनेक प्रवाशांचा अनुभव आहे.

गाडी सुटण्याच्या वेळेनंतर रद्द

पुणे ते सातारा डेमू ही गाडी रविवारी सकाळी ६ वाजून २० मिनिटांनी सुटणार होती. विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी प्रत्यक्षात आज सकाळी ८ वाजून १ मिनिटाने ही गाडी रद्द केल्याचे समाज माध्यमावर जाहीर केले. गाडी सुटण्याच्या सुमारे दोन तासांच्या कालावधीनंतर गाडी रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आल्याने प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

हेही वाचा : पिंपरी : रस्ते विकासाच्या ९० कोटींच्या कामात ‘रिंग’?

वारंवार गाड्यांना विलंब

हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस या गाडीला वारंवार विलंब होत आहे. याचबरोबर जबलपूर-पुणे, पुणे ते जम्मू तावी झेलम एक्स्प्रेस, गोरखपूर-पुणे या गाड्यांनाही विलंब होत आहे. या गाड्यांना काही वेळा तब्बल १० तासांपर्यंत विलंब होत आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

हेही वाचा : पिंपरी : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू

रेल्वे स्थानकावर गाडीत चढताना गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. आरक्षित तिकीट असूनही पुणे-दानापूर गाडीत प्रवाशांना बसता आले नाही. मात्र, तिकीट नसलेले प्रवासी गाडीत घुसले. रेल्वे प्रशासनाकडून यावर काहीच पावले उचलण्यात आली नाहीत.

अरविंद सिंग, प्रवासी
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune railway station railway passengers cannot board the train due to crowd passengers suffer pune print news stj 05 css