बदलापूरः बदलापूर रेल्वे स्थानकात गर्दी नियंत्रण आणि सुविधा उभारण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांमुळे प्रवाशांना दिलासा मिळताना दिसत नाही. मात्र अपुऱ्या आणि संथगतीच्या कामांमुळे प्रवाशांचे हाल कायम आहेत. सध्या पावसामुळे प्रवाशांना फलाट क्रमांक एक आणि दोन वर भिजतच उभे राहावे लागते आहे. काही ठिकाणी छप्पर असूनही ते अपुरे असल्याने एकतर पावसापासून रक्षण किंवा लोकलमध्ये जागा अशी काहीशी बदलापुरकर प्रवाशांची स्थिती आहे. तर स्थानकाबाहेरही पूर्व भागात पाणी साचत असल्याने प्रवाशांना कसरत करत स्थानक गाठावे लागते आहे. त्यामुळे प्रवाशांत संतापाचे वातावरण आहे.

बदलापूर रेल्वे स्थानकात रेल्वेच्या वतीने विविध सुविधा उभारल्या जात आहेत. फलाट क्रमांक एकशेजारी काही महिन्यांपूर्वी होम फलाट सुरू करण्यात आला. कालांतराने फलाट क्रमांक दोनवर सुविधा उभारण्यासाठी होम फलाटाला फलाट क्रमांक एकमध्ये बदलण्यात आले. तर फलाट क्रमांक एक आणि दोन जिथे दोन्ही बाजूने लोकलमधून चढता उतरता येत होते. तिथे एकची बाजू लोखंडी जाळी लावून बंद करण्यात आली. परिणामी आता मुंबईकडे जाणाऱ्या लोकल नव्या फलाट क्रमांक एकवरून सुटतात. हा फलाट अरूंद असल्याने येथून बाहेर पडताना आणि लोकल पकडताना प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते. येथे लोकलमध्ये चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या प्रवाशांमध्ये अनेकदा खटके उडतात.

विशेष म्हणजे या फलाटावर अजूनही छप्पर बसवण्याचे काम करण्यात आलेले नाही. याच फलाटाचे मोठ्या थाटामाटात तत्कालीन केंद्रिय मंत्री कपिल पाटील यांनी लोकार्पण केले होते. त्यावेळीही या फलाटावर छप्पर नव्हते. लोकार्पणाला आता वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. रेल्वेने काही ठिकाणी तात्पुरते लहान आकाराचे छप्पर टाकले आहे. तर काही ठिकाणी छप्पर लावण्याचे काम सुरू आहे. ज्या ठिकाणी छप्पर आहे तेथून पावसात लोकल पकडताना दमछाक होते. त्यामुळे एकतर छप्पर किंवा लोकलमध्ये जागा अशी स्थिती बदलापुरकर प्रवाशांची आहे. त्यात पावसामुळे फलाट क्रमांक एकवर काही ठिकाणी चिखलाची स्थिती निर्माण होते. त्यामुळे प्रवाशांत संतापाचे वातावरण आहे.

स्थानकाबाहेरही कसरतच

स्थानकात प्रवाशांना समस्यांचा सामना करत असताना स्थानकाबाहेर पडल्यानंतरही प्रवाशांच्या समस्या संपताना दिसत नाहीत. बदलापूर स्थानकाबाहेर पूर्वेला मुख्य रस्त्यावर पाणी साचत असल्याने स्थानकातून बाहेर पडल्यानंतर लांब उड्या किंवा कठड्यावरची कसरत करावी लागते आहे. तर पश्चिमेला स्थानकातून बाहेर पडल्यानंतर थेट वाहतूक कोंडीत जाऊन प्रवासी अडकत आहेत. त्यामुळे बदलापुरकरांच्या नशिबी रेल्वे प्रवासात अडचणींची सर्कस सुरू असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होते आहे.

महाविकास आघाडीतर्फे निवेदन

बदलापूर रेल्वे स्थानकातील विविध समस्यांवरून बुधवारी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी बदलापूर रेल्वे स्थानकात स्थानक व्यवस्थापकांची भेट घेत निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (शरद पवार) अविनाश देशमुख, शिवसेना ठाकरे गटाचे किशोर पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. येत्या दोन दिवसात विभागीय रेल्वे व्यवस्थापकांसह बैठकीचे आयोजन करण्यात आले अशी माहिती यावेळी देशमुख यांनी दिली.