ठाणे : लोकसभा जागा वाटपावरून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेच्या नाशिक येथील जागेवर भाजपने दावा केल्याने रविवारी रात्री उशिरा अस्वस्थ झालेले खासदार हेमंत गोडसे हे त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी दाखल झाले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत गोडसे यांच्यावर अन्याय होणार नाही असे आश्वासन दिले. हेमंत गोडसे यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे हे देखील उपस्थित होते.

नाशिकमध्ये भाजपची संघटनात्मक ताकद निर्माण झाल्याने भाजपने नाशिक लोकसभेच्या जागेवर दावा करण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांनी एका कार्यक्रमात खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे भाजपने नाराजी व्यक्त केली होती. नाशिकच्या जागेचा तिढा सुटत नसल्याने हेमंत गोडसे हे त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी दाखल झाले. यावेळी त्यांच्याकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत गोडसे यांच्यासह पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

हेही वाचा – वंचितच्या भूमिकेने औरंगाबादमध्ये ठाकरे गटात चलबिचल

नाशिक आपला बालेकिल्ला आहे. नाशिकवर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे प्रेम होते आणि माझेही आहे. मोदींच्या नेतृत्वात पुन्हा एकदा आपल्याला महायुतीचे सरकार आणायचे आहे. आपण राज्यात ४५ पार म्हणतो. त्यामुळे एक-एक जागा आपल्याला महत्वाची आहे. काही जागांवर चर्चा सुरु आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यामध्ये लक्ष घालत आहेत. मात्र, नाशिकची जागा आपल्या धनुष्यबाणाकडे राहिली पाहिजे. आपला आग्रह मी त्यांना सांगितलेला आहे. कोणत्याही बातम्यांवर, अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

हेही वाचा – सुनील तटकरेंचाही कडेलोट करावा लागेल… शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचे धक्कादायक वक्तव्य

हेही वाचा – विश्लेषण : मराठा मतपेढी मराठवाड्यात किती प्रभावी? जरांगेंमुळे मतदानाची समीकरणे बदलतील?

तुम्ही खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठिशी उभे राहा. आपल्या खासदारांवर अन्याय होणार नाही. याची काळजी मी घेईल. त्यामुळे तुम्ही काळजी करु नका. राज्यातील ७ ते ८ मतदारसंघावर चर्चा सुरु आहे. आपल्याला नक्कीच त्यामध्ये यश मिळेल. तुमच्या भावना, तुमचा आग्रह हा माझा आग्रह आहे. महायुतीमध्ये आपण जास्तीत जास्त जागा जिंकून देऊ. जास्त जागा आल्या तर आपल्याला आपल्या कामाची पोचपावती मिळेल असे शिंदे म्हणाले.