ठाणे : मध्य रेल्वेच्या मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ मुंबईकडे जाणाऱ्या लोकल गाडीतून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटोनंतर सर्वत्र संताप व्यक्त होऊ लागला असतानाच या घटनेनंतर आक्रमक झालेल्या मनसेने रेल्वे प्रशासनाविरोधात उद्या धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या, मंगळवारी सकाळी ९ वाजता गावदेवी मैदान ते ठाणे स्थानकापर्यंत हा मोर्चा असणार आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरात सोमवारी सकाळी दोन उपनगरीय रेल्वेगाड्या एकमेकांच्या जवळून गेल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात रेल्वे डब्याच्या दारात उभे राहिलेल्या प्रवासी रेल्वे रूळावर पडले. यामध्ये चार प्रवाशांचा मृत्यू झाला. तर ११ प्रवासी या घटनेत जखमी झाले. या अपघातानंतर मनसे आक्रमक झाल्याचे दिसून आले. रेल्वे प्रशासनाच्या विरोधी हा मोर्चा असणार आहे. यामध्ये प्रवाशांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्यावतीने करण्यात आले आहे.