लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभा आता संबंध देशभरात सुरू आहेत. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीकास्र सोडत आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपावर टीका केली होती. पतंप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तराखंडच्या दौऱ्यावर असताना त्यांनी या टीकेला उत्तर दिले. ते म्हणाले, “विरोधकांमधील शाही कुटुंबातील राजकुमार म्हणतात की, भाजपाला तिसऱ्यांदा सत्ता मिळाल्यानंतर देशभरात आगडोंब पसरेल. ते स्वतः ६० वर्ष सत्तेत होते. मात्र फक्त १० वर्ष सत्तेबाहेर राहिल्यानंतर त्यांना देशात आगडोंब पसरण्याइतपत भाषा वापरावी लागत आहे.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उत्तराखंडच्या रुद्रपूर येथे जाहीर सभेला संबोधित करत असताना पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधींच्या टीकेचा समाचार घेतला. यावेळी उपस्थितांना आवाहन करताना ते म्हणाले की, तुम्ही अशा लोकांना धडा शिकवणार की नाही. “चुन चुनके साफ कर दो, इस बार इन्हे मैदान मे मत रहने दो” (या लोकांना निवडून निवडून साफ करा, यावेळी त्यांना मैदानातही टीकू देऊ नका) असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. काँग्रेसचे लोक अजूनही आणीबाणीच्या मनोवृत्तीत आहेत. त्यांना लोकशाहीवर विश्वास नाही. त्यामुळेच जनमताच्या विरोधात ते जनतेला चिथावणी देण्याचे काम करत आहेत, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

Delhi Liquor Scam: ‘ईडी’ने हरकत न घेतल्याने ‘आप’ नेते संजय सिंह यांना जामीन मंजूर

भाजपाची तिसऱ्यांदा सत्ता आली तर.. – राहुल गांधी

रविवारी (दि. ३१ मार्च) दिल्लीच्या रामलीला मैदानात इंडिया आघाडीच्या सभेत बोलत असताना राहुल गांधी म्हणाले होते की, भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीत फिक्सिंग केलेले आहे. ईव्हीएममध्ये घोळ घालणे, सोशल मीडिया आणि माध्यमांवर दबाव टाकणे हे उपाय योजल्याशिवाय भाजपा १८० पेक्षा अधिक जागी जिंकूच शकत नाही. जर देशात तिसऱ्यांदा भाजपाची सत्ता आली आणि त्यांनी संविधानाला बदलण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण देशात आगडोंब पसरेल. माझे शब्द लिहून ठेवा. हा देश वाचणार नाही.

रुद्रपूर येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “यावेळच्या लोकसभा निवडणुकीला दोन गट तुम्हाला दिसतील. एका बाजूला आमचा गट प्रामाणिकता आणि पारदर्शकता घेऊन लोकांसमोर येत आहे. तर दुसऱ्या बाजूला भ्रष्ट आणि घराणेशाही असलेला गट आहे. हे भ्रष्ट लोक मोदीला धमकावण्याचे आणि शिवीगाळ करण्याचे काम करतात. आम्ही म्हणतो भ्रष्टाचार हटवा, ते म्हणतात, भ्रष्टाचार वाचवा.”

भ्रष्टाचाराविरोधात आणखी कडक कारवाई होणार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर रविवारी दिल्लीत विरोधकांनी जाहीर सभा घेत केंद्र सरकारवर टीका केली. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांना नामोहरण केले जात असल्याचे विरोधकांनी या सभेत म्हटले. यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मला धमक्या दिल्या तरी मी घाबरणार नाही. प्रत्येक भ्रष्ट व्यक्तीविरोधात माझी कारवाई सुरूच राहिल. जेव्हा आम्ही तिसऱ्यांदा सत्तेत येऊ तेव्हा भ्रष्टाचाऱ्यांच्या विरोधात आणखी कडक कारवाई होईल, ही माझी गॅरंटी आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chun chun ke saaf kar do pm counters rahul gandhis fire remarks kvg