Raj Thackeray on Maharashtra Vidhan Sabha Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलं आहे. एकीकडे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पाहायला मिळत असताना दुसरीकडे काही मतदारसंघांमध्ये मनसे, वंचित किंवा बंडखोर अपक्षांमुळे निवडणूक बहुरंगी होऊ लागली आहे. त्याचवेळी बारामतीसारखे एकाच कुटुंबातील सामनेही मतदारांसाठी उत्सुकतेचा विषय ठरू लागले आहेत. पण या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे एकीकडे महायुतीसोबत असल्याचं चित्र असताना दुसरीकडे भाजपा, एकनाथ शिंदे किंवा अजित पवारांवर थेट टीका करतानाही दिसत आहेत. नुकतंच त्यांनी याचसंदर्भात लोकसभा निवडणूक निकालांबाबत भाष्य केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज ठाकरेंनी यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर आपण सत्तेत असू व आपल्या सहभागानिशी महायुती सरकार स्थापन करेल असे सूतोवाच केल्यानंतर तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. त्यापाठोपाठ राज ठाकरेंनी राज्यभरात १२५ हून अधिक ठिकाणी उमेदवार उभे करून नव्या सत्तासमीकरणांचं गणित मांडलं. त्यातच जाहीर सभांमधून ते सत्ताधारी महायुतीतील घटकपक्षांबाबत नाराजी व्यक्त करत असल्यामुळे त्यांच्या मनात नेमकं काय आहे? याबाबत तर्क-वितर्क चालू आहेत. याचदरम्यान, त्यांनी मुंबई तकला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने भाजपा व मित्रपक्षांच्या पीछेहाटीवर भूमिका मांडली.

काय म्हणाले राज ठाकरे?

राज ठाकरेंनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणीत एनडीएच्या पीछेहाटीची दोन कारणं नमूद केली. “पहिलं म्हणजे सरकारबद्दल लोकांना राग असतोच. दुसरी गोष्ट म्हणजे देशातल्या मुसलमानांनी शिस्तबद्ध पद्धतीने वोटर कार्डपासून सगळ्या गोष्टी आधीच व्यवस्थित भरून घेतल्या. ते काम त्यांनी अत्यंत शांतपणे केलं. आणि मग मोदी-शाहांच्या विरोधात एकगठ्ठा मतं काँग्रेसला दिली. त्याचवेळी भाजपाचा एक उमेदवार अयोध्येत पचकला की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही संविधान बदलू. हे म्हणजे पायावर कुऱ्हाड नाही मारली. कोपऱ्यातल्या कुऱ्हाडीवर जाऊन स्वत: पाय मारला. ते पसरत गेलं. या दोन गोष्टींचा मोठा फटका बसला”, असं राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray in Nashik : “निवडणुका म्हणजे तुम्हाला सांगतो…”, प्रचारसभांना कंटाळून राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

महाराष्ट्रातली पक्षफूट लोकांना पटली नाही?

दरम्यान, महाराष्ट्रातही महायुतीला लोकसभा निवडणुकीत बसलेला फटका चर्चेचा विषय होता. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट चुकीची होती, अशी भूमिका राज ठाकरेंनी सातत्याने सभांमधून मांडली आहे. या मुलाखतीतही त्यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. “हे कुणाच्याही बाबतीत व्हायला नको. याला काही अर्थच राहात नाही. २०-२५ वर्षांपूर्वीपर्यंत एक हेल्दी पॉलिटिक्स असायचं. आता हे सगळं सूडाच्या पातळीवर जायला लागलं आहे”, असं ते म्हणाले.

पुन्हा शरद पवार लक्ष्य!

राज ठाकरेंनी यावेळी बोलताना पुन्हा एकदा शरद पवारांना लक्ष्य केलं. “ही सगळी सुरुवात ७८ ला शरद पवारांनी केली. मग राज्यात फोडाफोडीचं राजकारण सुरू झालं. त्यांनी काँग्रेस फोडली. नंतर दोनदा शिवसेना फोडली. आता शिंदेंनी फोडली. मग राष्ट्रवादी फुटली. तुम्ही फोडली इथपर्यंत समजू शकतो. पण आता हे वेगळ्याच पातळीवर जायला लागलं. नाव आणि चिन्हच बदलायला लागलंय. नैतिकता नावाची काही गोष्टच उरलेली नाही. तुम्ही तुमची माणसं घेऊन गेलात ना, मग सत्ता चालवा. आत्तापर्यंत पक्षात विलीनच झाले ना लोक. मला स्वत:ला ही बाब पटत नाही की कुणाच्याही बाबतीत ते व्हावं. बाकी तुम्हाला काय राजकीय खेळ खेळायचे ते खेळा. यासाठी भाजपा जबाबदार आहेच”, असं राज ठाकरे म्हणाले.

“लोकसभा निवडणुकीवेळी अनेकांची वेगवेगळी कारणं होती. काहींना पालिका निवडणुका घेतल्या नाही म्हणून राग होता. ७७ ला आणीबाणी हे एक कारण होतं. पण या लोकसभेला अनेकांची वेगवेगळी कारणं होती. ती साचली होती. त्याचा राग निघाला”, असंही त्यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray slams bjp eknath shinde amid maharashtra election 2024 pmw