लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी २० मे रोजी मतदान पार पडणार आहे. या पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान होणार आहे. प्रचारासाठी अवघे चार दिवस उरले असताना आता मुंबई, ठाण्यातील प्रचाराला वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून मुंबईत आज सायंकाळी त्यांचा रोड शो होणार आहे. या रोड शोच्या माध्यमातून भाजपा जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहे. उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत रोड शो वर जोरदार टीका केली. पंतप्रधान मोदी घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनास्थळी भेट देतील का? असा प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, मोदी त्याठिकाणी जाऊन मगरीचे अश्रू ढाळतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मविआने पंतप्रधानांना रस्त्यावर आणले

“महाविकास आघाडी आणि शिवसेनेने देशाच्या पंतप्रधानांना रस्त्यावर आणण्याचे काम केले आहे. पराभवाच्या भीतीनं भाजपावाले पंतप्रधान मोदींना गल्लीबोळात, रस्त्यांवर फिरवत आहेत. मुंबईतल्या सहा जागांवर आम्ही लढत आहोत. त्यापैकी सर्व जागा जिंकण्याचा आमचा निश्चय पक्का आहे. पंतप्रधान मोदींना महाराष्ट्रात ठाण मांडून बसावं लागत आहे. तुमच्यावर दारोदार, रस्त्यांवर फिरण्याची वेळ का आली?”, याचा विचार भाजपाने करावा.

संजय राऊत पुढे म्हणाले, “पंतप्रधान सर्व सोडून देशभर रोड शो करत आहे, त्यांना दुसरे काम नाही का? पंतप्रधान मणिपूरमध्ये मात्र कधी गेले नाहीत, जम्मूतील काश्मिरी पंडितांचे अश्रू पुसण्यासाठी गेले नाहीत. घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून १८ लोक मृत्यूमुखी पडले, त्यांच्या मनात त्याबद्दल संवेदना नाही. आज कदाचित तिथे जाऊन ते नेहमीप्रमाणे नाटकी अश्रू ढाळतील. पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी जातील, तिथला महायुतीचा उमेदवार पडणार हे नक्की. लोक मोदींना गो बॅक बोलत आहेत.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबईत रोड शो; असा असणार रॅलीचा मार्ग

मोदी ब्रँड आता लयास गेला

महाराष्ट्रात आतापर्यंत ज्या ज्या मतदारसंघात मतदान पार पडले, तिथल्या ९० टक्के जागा महाविकास आघाडी जिंकत आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, दिंडोरी यापैकी बहुसंख्या जागा मविआ जिंकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात आले पाहीजे, मग त्यांना समजले त्यांचा ब्रँड आता संपला आहे. ४ जून नंतर त्यांना झोळी उचलून हिमालयात जायचे आहे, ती व्यवस्था महाराष्ट्र करेल, अशीही टीका संजय राऊत यांनी केली.

“मी मुस्लीम कुटुंबांत राहिलो, मला अनेक मुस्लीम मित्र, पण २००२ नंतर…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान चर्चेत

पंतप्रधानांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी पंतप्रधान मोदींच्या डोक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप घातल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. यावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, ज्या प्रफुल पटेलांवर इक्बाल मिर्चीशी संबंध असल्याचा आरोप खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केला होता. त्याच मिर्चीवाल्याच्या हातून त्यांनी जिरेटोप घेतला. हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान तर आहे, तसेच महाराष्ट्र या घटनेकडे अंत्यत गांभीर्याने पाहत आहे, अशीही टीका संजय राऊत यांनी केला.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut slams pm narendra modi road show in mumbai kvg