Nagpur Vidhan Sabha Winter Session 2023 Updates, 11 December 2023 : राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनाचा आजचा (११ डिसेंबर) तिसरा दिवस आहे. विधीमंडळात आजही राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक आणि माजी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावरून आरोप-प्रत्यारोप होऊ शकतात. तसेच काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्यावरील प्राप्तीकर विभागाच्या धाडींनंतर काँग्रेसवर देशभरातून टीका होत आहे. याचे पडसाद महाराष्ट्राच्या विधीमंडळ अधिवेशनातही पाहायला मिळू शकतात. कारण राज्यभरात अनेक ठिकाणी भाजपा कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आंदोलनं करत आहेत. यासह अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरही चर्चा होऊ शकते. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे सांगलीतल्या वसंतदादा सहकारी साखर कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन करत आहे. याबाबतचे अपडेट्सही या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील आणि राज्यभरातील वेगवेगळ्या बातम्यांचा आढावा घेतला जाईल.
Nagpur Assembly Winter Session 2023 Updates : हिवाळी अधिवेशनासह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.
पातूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी मुलीला पळवून नेल्याची तक्रार झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
मुंबई : म्हाडाच्या परीक्षेतील तोतया उमेदवार, कॉपी गैरप्रकारानंतर भरतीतील आणखी एक गैरप्रकार उघड झाला आहे. भरतीतील एक यशस्वी उमेदवार अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र सादर करून सेवेत रुजू झाला होता. ही बाब निदर्शनास आल्यानंतर म्हाडाने या उमेदवाराला सेवेतून बडतर्फ केले असून म्हाडाने उमेदवार आणि त्याच्या साथीदाराविरोधात खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कल्याण : येथील पूर्व भागातील विजयनगर भागात एका ज्येष्ठ नागरिकाला त्याच्या पतीने आपल्या मुलीच्या दोन मित्रांची मदत घेऊन अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न शुक्रवारी केला. होरपळलेल्या ज्येष्ठ नागरिकावर नवी मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा रविवारी मृत्यू झाला.या घटनेने कल्याणमध्ये खळबळ उडाली आहे.
उरण : जेएनपीटी बंदर ते मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया दरम्यानच्या जलसेवेत बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार ११ ते १४ डिसेंबर दरम्यान जेएनपीटी मधून सुटणारी लाँच ही गेट वे ऑफ इंडिया ऐवजी भाऊचा धक्का पर्यंत जाणार आहे अशी माहिती जेएनपीटी वाहतूक विभागाने दिली आहे.
लोणावळा दरम्यान लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या आणि पुणे-लोणावळा लोकलच्या फेऱ्यांची संख्या वाढवावी या मागण्या घेऊन मनसेकडून लोणावळा रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन करण्यात आलं.
राज शेट्टी यांच्या सांगलीत चालू असलेल्या आंदोलनाबाबत अजित पवार म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याचा ऊसाचा प्रश्न सुटला आहे. तशीच मागणी राजू शेट्टी यांनी सांगली जिल्ह्यासाठीदेखील केली आहे. कोल्हापूरच्या कारखानदारांनी एकत्र बसून मार्ग काढला. त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्यातल्या नेत्यांनी एकत्र बसून तोडगा काढावा.
महाराष्ट्रात कांद्याचा प्रश्न चांगलाच तापला आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याचे राज्यात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. केंद्राच्या या निर्णयामुळे कांद्याचे दर गडगडले आहेत. कांद्याला दर मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षदेखील केंद्र सरकारवर टीका करत आहे. अशातच राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी रात्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यापाठोपाठ आता ते केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत.
अजित पवार यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, कांद्याचा प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारित आहे. तसेच केंद्राने ऊसापासून इथेनॉल बनवण्यास बंदी घातली आहे. हे दोन्ही विषय केंद्र सरकारचे आहेत. त्यामुळे मी काल यासंदर्भात नितीन गडकरी यांची भेट घेतली. आता अमित शाह यांची भेट घेणार आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ही भेट घेऊ.
माजी मुख्यमंत्री आणि विधान परिषदेचे आमदार उद्धव ठाकरे आज (११ डिसेंबर) विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित राहणार.
वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यासमोर ठिय्या आंदोलनाला बसलेले राजू शेट्टी म्हणाले, ऊसाच्या एफआरपीबाबत कोल्हापुरात बोलणी झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्यांबरोबर प्रदीर्घ चर्चा होऊन एक करार झाला आहे. परंतु, सांगलीतले दोन नेते आणि त्यांच्या कारखान्यांमुळे अडचण येत आहे. या नेत्यांचा अहंकार मध्ये येतोय. आमदार जयंत पाटील आणि विश्वजीत कदम या दोघांच्या अहंकारापोटी आज सांगलीतल्या १६ कारखान्यांना वेठीस धरलं जातंय. यांची ही दादागिरी आम्ही मोडून काढल्याशिवाय गप्प बसणर नाही.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचं गेल्या २३ तासांपासून सांगलीत आंदोलन चालू आहे. माजी खासदर राजू शेट्टी आणि त्यांचे सहकारी वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन करत आहे. या ठिय्या आंदोलनामुळे कारखान्याचं गाळप बंद आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने शेट्टी यांना १६ डिसेंबर रोजी बैठकीला येण्याचा प्रस्ताव दिला आहे. परंतु, आधी ऊसाचा एफआरपी जाहीर करण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.
“तेलंगणात भाजपाने ओवेसी योजना अंमलात आणली, पण…”,
भाजपाच्या तेलंगणातील पराभवावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाने भाजपा नेतृत्वाला टोला लगावला आहे. ठाकरे गटाने ‘सामना’ या त्यांच्या मुखपत्रातील अग्रलेखात म्हटलं आहे की, “तेलंगणात मोदी-शहांच्या भाजपाची धूळधाण उडाली. मध्य प्रदेश, राजस्थान वगैरे राज्यांत जे मोदी-शहा होते तेच तेलंगणात होते व ‘जमकर’ प्रचार करीत होते. योजनांच्या घोषणा व नेहमीचे तांडव करीत होते. मुसलमानांची मते काँग्रेसकडे जाऊ नयेत यासाठी ‘ओवेसी’ योजनाही अमलात आणली. तरीही काँग्रेसचा विजय झाला”, अशी टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली.