पंढरपूर : अतिवृष्टी व पुरामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले दिसून येत आहे. शेती पिकांचे, जनावरांचे, घरांचे, व्यावसायिकांचे खूप मोठे नुकसान झालेले असून, पूरग्रस्त नागरिकांनी अशा संकटाच्या काळात धीर धरावा, राज्य शासन संकटकाळात पूरग्रस्तांच्या पूर्णपणे पाठीशी असून, दिवाळीपूर्वी मदत दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तर अतिवृष्टी व पुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत दिली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. शेतीच्या बांधावर जाऊन मंत्र्यांनी पाहणी केली तर पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील निमगाव तसेच दारफळ सीना या गावाला भेट देऊन पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. त्यांनी दोन्ही गावातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रणजीत मोहिते पाटील, आमदार अभिजित पाटील, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अतिवृष्टी व पूर आल्यामुळे ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या सर्वांना शासनाकडून मदत दिली जाणार आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून दोन हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापुढेही पूरग्रस्तांना आवश्यक मदत देण्यासाठी शासन हात आखडता घेणार नाही. शासन टंचाई काळात ज्या निकषाप्रमाणे मदत करते त्याप्रमाणेच अती पावसात, ओल्या दुष्काळात ही मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितले. प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढा तालुक्यातील निमगाव येथे नुकसानीची पाहणी केली आणि नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या.
तर बुधवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी करमाळा तालुक्यातील कोर्टी या गावापासून पाहणी सुरू केली. त्यानंतर माढा तालुक्यातील मुंगशी, मोहोळ तालुक्यातील लांबोटी या भागांतील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी उपमुख्यमंत्री पवार यांनी केली. यावेळी आमदार नारायण आबा पाटील, अपर जिल्हाधिकारी मोनिकासिंह ठाकुर, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळी आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, करमाळा, माढा, मोहोळ तालुक्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे प्रचंड नुकसान झाले असून, राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.
पूर परिस्थितीमुळे उडीद, मका, सोयाबीन, तूर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, घरांचे व पशुधनाचेही नुकसान झाले आहे. सर्व नुकसानग्रस्त घटकांचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले. पवार यांनी चावडीवर बसून शेतकरी, नागरिकांच्या व्यथा, समस्या जाणून घेतल्या. बाधित शेतकऱ्यांना शासनातर्फे लवकरच मदत दिली जाईल, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.