Maharashtra News Today, 29 August 2022 : राज्यातील सत्तासंघर्षावरील सुप्रीम कोर्टातील सुनावणीची तारीख अद्याप निश्चित झालेली नसल्याने सत्तापेच कायम आहे. यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी मोठं विधान केलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल असं भाकीत अमोल मिटकरी यांनी केलं आहे. बोदवड येथे रोहिणी खडसे यांनी संवाद यात्रेचं आयोजन केलं होतं. यावेळी बोलताना अमोल मिटकरी यांनी भाजपावर जोरदार टीका केली.

मुंबईतील एसी लोकल विरोधात प्रवाशांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. एसी लोकलमुळे इतर रेल्वे गाड्या रद्द होत असल्याने मुंबईतील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांचा खोळंबा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्र्यातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत रेल्वे प्रशासनाला गंभीर इशारा दिला आहे. गरीब माणसाला जर एसी परवडत नसेल, तर एसी फेकू आंदोलन करू, असा इशारा आव्हाड यांनी दिला आहे. हा प्रश्न केवळ कळवा-मुंब्रा पुरता मर्यादीत नाही. हे आंदोलन गरीब विरुद्ध एअर कंडिशन असे असल्याचे आव्हाड म्हणाले आहेत. हा विषयही दिवसभर चर्चेत असणार आहे.

याशिवाय महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि कलाविषयक घडामोडींचा आढावा एकाच ठिकाणी…

Live Updates

Maharashtra Live News Today : शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार? अमोल मिटकरींचं मोठं विधान, म्हणाले…

13:53 (IST) 29 Aug 2022
मुख्यमंत्री ठाण्याचे तरी ‘दिवा’ अंधारातच , मनसे आमदार प्रमोद पाटील यांच्यासह नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया

कल्याण ग्रामीण विधानसभा हद्दीत विकास कामे करताना किमान राजकीय वादाचे घोंगडे या भागात भिजत घालू नये. दूरदृष्टीने या भागाचा विकास करावा, असे या भागातील रहिवाशांचे मत आहे. तर कल्याण ग्रामीणचे मनसेचे आ. प्रमोद पाटील यांनीही ठाण्यासाठी विकासाची पॅकेज देणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर टी्वट करुन टीका केली आहे. तसेच धनाढ्य विकासकांच्या १० गाव हद्दीतील रस्ते कामे एमएमआरडीएने हाती घेतल्याने टीका केली आहे.

सविस्तर वाचा…

13:43 (IST) 29 Aug 2022
अकोला : दारूची अवैध विक्री करू देण्यासाठी लाच घेताना दोन पोलीस ‘एसीबी’च्या जाळ्यात

देशी दारूची अवैध विक्री करू देण्यासाठी दहिहंडा पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकाने एक हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उपनिरीक्षकासह लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले. ही कारवाई चोहोट्टा बाजार येथील पोलीस चौकी बाहेरच करण्यात आली. उपनिरीक्षक भारत सखाराम सोळंके (५६) व रवी राजधर इंगळे (४३, पोलीस नाईक) अशी आरोपींची नावे आहेत. वाचा सविस्तर बातमी…

13:24 (IST) 29 Aug 2022
नागपूर : उपमुख्यमंत्र्यांच्या शहरातील खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ‘यमराज’ अवतरले रस्त्यावर

नागपूर शहरातील विविध भागात डांबरी रस्त्यावरील खड्ड्यांकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिटीझन्स फोरमच्या कार्यकत्यानी ‘यमराज’ची वेशभूषा करून आंदोलन केले. ‘खड्डे दाखवा-झोपेतून जागवा’ या अभियानास फोरमच्यावतीने सुरुवात करण्यात आली असून खड्ड्यांचे फोटो पाठवण्याचे आवाहन केले आहे. वाचा सविस्तर बातमी…

13:05 (IST) 29 Aug 2022
गुलाबराव पाटलांना मंत्रीपदावरून परत टपरीवर चुना लावायला बसावं लागणार – रुपाली पाटील

शिंदे आणि फडणवीस सरकारमधील पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी जळगावमधील एका कार्यक्रमामध्ये केलेल्या एका विधानावरुन नवीन वाद निर्माण झाला आहे. “मंत्र्यांपेक्षा डॉक्टर बरे. स्त्रीरोग तज्ञ कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा कधीही स्त्रीरोग तज्ञ होऊ शकत नाही,” असं गुलाबराव पाटील यांनी एक जाहीर कार्यक्रमातील भाषणात म्हटलं आहे. यावरून आता नव्या वादाला सुरुवात झाल्याचे दिसत आहे. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर देखील त्यांनी निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर बातमी…

12:50 (IST) 29 Aug 2022
Raj Thackeray Meets Fadnavis: राज ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट, एक तास सुरु होती बैठक, चर्चांना उधाण

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी त्यांचं शासकीय निवासस्थान सागर बंगल्यावर पोहोचले होते. जवळपास तासभर दोघांमध्ये चर्चा सुरु होती. या भेटीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण या भेटीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं असून, अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची शक्यता बोलली जात आहे.

सविस्तर बातमी

12:18 (IST) 29 Aug 2022
वांद्रे-वरळी सागरीसेतूवर २०३९ पर्यंत टोल द्यावा लागणार, न्यायालयाने याचिका फेटाळताच नव्या कंत्राटदाराची नियुक्ती

महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वाद्रे-वरळी सागरीसेतूवरून जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांचालकांकडून टोल वसूल करण्यासाठी अखेर नव्या कंत्राटदाराची नियुक्ती केली असून नव्या कंत्राटदाराने टोल वसुलीला सुरुवात केली. फेरनिविदांच्या विरोधात दाखल याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर सागरीसेतूवरील टोल वसुलीसाठी कंत्राटदाराच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला.

सविस्तर वाचा…

11:36 (IST) 29 Aug 2022
Shivsena Sambhaji Brigade Yuti: “भाजपाशी युती असताना त्यांनी तरी २५ वर्षांमध्ये…”, “४०-५० ‘खोके हराम’ ऊठसूट…”; सेनेचा हल्लाबोल

शिवसेनेनं संभाजी ब्रिगेडसोबत केलेल्या युतीचं समर्थन केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्वाचा मुद्दा भाजपा आणि शिंदे गटाकडून केवळ राजकीय स्वार्थासाठी वापरला जात आहे. जम्मू-काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्तींसोबत सत्तेत बसणाऱ्यांना हिंदुत्वाबद्दल बोलू नये अशा आशयाची टीका करत शिवसेनेनं संभाजी ब्रिगेडसोबतच्या युतीवरुन टीका करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाबरोबरच भाजपालाही लक्ष्य केलं आहे. दिल्लीत बादशाही, दुसरे महायुद्धासारखे अनेक ऐतिहासिक संदर्भ देत शिवसेनेनं संभाजी ब्रिगेडसोबतची युती योग्य कशी आहे यासंदर्भातील युक्तीवाद केला आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त

11:34 (IST) 29 Aug 2022
पुण्यात केंद्र सरकारविरोधात सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘जनआक्रोश’ आंदोलन

“भाजीपाला ते औषधींपर्यंत केंद्र सरकारने महागाई करून ठेवली आहे. या महागाईमधून देशातील जनतेला बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने विशेष प्रयत्न केले पाहिजे. मात्र हे सरकार कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही. म्हणून महागाईच्या विरोधात आम्ही आंदोलन करुन या सरकारला जागे करण्यासाठी अखेरपर्यंत आंदोलन करीत राहणार आहोत.” असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर बातमी…

11:34 (IST) 29 Aug 2022
“स्त्रीरोग तज्ज्ञ कधीच हातपाय बघत नाही आणि…”; डॉक्टरांबद्दल बोलताना शिंदे सरकारचे मंत्री गुलाबराव पाटील यांचं वादग्रस्त विधान

शिंदे आणि फडणवीस सरकारमधील पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी जळगावमधील एका कार्यक्रमामध्ये केलेल्या एका विधानावरुन नवीन वाद निर्माण झाला आहे. गुलाबराव पाटील यांनी जळगावात एका कार्यक्रमामध्ये डॉक्टर आणि मंत्र्यांमधील साधर्म्य सांगताना भाषणादरम्यान हे विधान केलं आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त

11:32 (IST) 29 Aug 2022
Share Market: पाच मिनिटांत गुंतवणूकदारांचे साडेपाच लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १२५० अंकांनी आपटला, ३० पैकी २८ कंपन्या तोट्यात

जागतिक स्तरावरील निराशेच्या संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारामध्ये मोठी पडझड झाली आहे. आज शेअर बाजाराची सुरुवात होताच सेनसेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण पहायला मिळाली. सेन्सेक्स १२५० अंकांनी गडगडला तर निफ्टी १७ हजार २०० पर्यंत घसरला आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजारामध्ये पडझड होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. येथे वाचा सविस्तर वृत्त

11:21 (IST) 29 Aug 2022
खड्ड्याने घेतला आणखी जीव, डोंबिवली जवळील आगासन गावात खड्डा चुकविताना तरुणाचा मृत्यू

डोंबिवली जवळील आगासन गाव हद्दीत रविवारी रात्री दुचाकी वरुन जात असताना एका तरुणाचा खड्डे चुकवित असताना तोल गेला आणि त्याचवेळी समोरुन येत असलेल्या पाण्याच्या टँकर खाली चिरडून जागीच मृत्यू झाला. घटना घडताच टँकर चालक पळून गेला. या घटनेने दिवा, आगासन परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

सविस्तर वाचा…

11:08 (IST) 29 Aug 2022
नोएडात ट्विन टॉवर पाडल्यानंतर मुंबईतही कारवाई? सोमय्यांची शिंदे सरकारकडे मागणी, प्रताप सरनाईकांचाही उल्लेख

नोएडामधील अनधिकृत टॉवर्सवर कारवाई करण्यात आल्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईतील अनधिकृत टॉवर्सचा मुद्दा उपस्थित केला आहे. किरीट सोमय्या यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी बिल्डर आणि महापालिकेचे भ्रष्ट अधिकारी यांचं विशेष ऑडिट करण्याची मागणी केली आहे.

सविस्तर बातमी

10:42 (IST) 29 Aug 2022
“…तर एसी फेकू आंदोलन करू”, जितेंद्र आव्हाडांचा रेल्वे प्रशासनाला इशारा

मुंबईतील एसी लोकल विरोधात प्रवाशांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. एसी लोकलमुळे इतर रेल्वे गाड्या रद्द होत असल्याने मुंबईतील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांचा खोळंबा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्र्यातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत रेल्वे प्रशासनाला गंभीर इशारा दिला आहे. गरीब माणसाला जर एसी परवडत नसेल, तर एसी फेकू आंदोलन करू, असा इशारा आव्हाड यांनी दिला आहे. हा प्रश्न केवळ कळवा-मुंब्रा पुरता मर्यादीत नाही. हे आंदोलन गरीब विरुद्ध एअर कंडिशन असे असल्याचे आव्हाड म्हणाले आहेत.

सविस्तर वाचा

10:23 (IST) 29 Aug 2022
पुण्यात बांधकाम व्यावसायिकाची तब्बल सहा कोटींची फसवणूक

बांधकाम करारानुसार पाच कोटी ३५ लाख आणि हात उसने घेतलेले ५२ लाख ६५ हजार रुपये परत न करता प्रकल्पातील सदनिकेची परस्पर विक्री करून गुंडांमार्फत गाळ्यांचा ताबा घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी माजी नगरसेवकासह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वाचा सविस्तर बातमी…

10:06 (IST) 29 Aug 2022
चंद्रपूर : ८५ वर्षीय जलयोग साधक कृष्णराव नागपुरेंच्या विक्रमाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद

चंद्रपूर शहरातील ८५ वर्षीय जलयोग साधक कृष्णराव नागपुरे यांनी रविवार २८ ऑगस्ट रोजी एका विक्रमाला गवसणी घातली. जलतरण तलावात ३७ प्रकारचे योग प्रकार एका तासाच्या कालावधीत करून दाखवले. त्यांच्या या विक्रमाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ने घेतली आहे. त्यांच्या या अनोख्या विक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. वाचा सविस्तर बातमी…

10:02 (IST) 29 Aug 2022
शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार? अमोल मिटकरींचं मोठं विधान

राज्यातील सत्तासंघर्षावरील सुप्रीम कोर्टातील सुनावणीची तारीख अद्याप निश्चित झालेली नसल्याने सत्तापेच कायम आहे. यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांना मोठं विधान केलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल असं भाकीत अमोल मिटकरी यांनी केलं आहे. बोदवड येथे रोहिणी खडसे यांनी संवाद यात्रेचं आयोजन केलं होतं. यावेळी बोलताना अमोल मिटकरी यांनी भाजपावर जोरदार टीका केली.

सविस्तर बातमी

10:01 (IST) 29 Aug 2022
“पंकजाताई नीट ओळखा, तुम्हाला अप्रत्यक्षपणे…,” अमोल मिटकरींचा भाजपावर गंभीर आरोप, स्टेजवरुनच दिली ऑफर

गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्या पुण्याईने भाजपा पक्ष वाढला, मात्र सूडाचं राजकारण करुन त्यांच्याच मुलीचा पराभव केला. पक्ष वाढवणाऱ्यांचेच पंख छाटले जात आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावं असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी दिला आहे. जळगावमधील बोदवड येथे रोहिणी खडसे यांनी संवाद यात्रेचं आयोजन केलं होतं. यावेळी बोलताना अमोल मिटकरी यांनी भाजपावर जोरदार टीका केली.

सविस्तर बातमी

09:57 (IST) 29 Aug 2022
पुणे : सत्ताधाऱ्यांना पवारांची संगत नकोशी?

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या रविवारी वाकड (पिंपरी-चिंचवड) येथे झालेल्या वार्षिक मेळाव्याकडे राज्यातील सत्ताधाऱ्यांनी पाठ फिरवली. संघाच्या निमंत्रण पत्रिकेत मेळाव्याचे उद्घाटक म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची नावे होती. पण, या तिघांनीही मेळाव्याकडे पाठ फिरवली. यांच्या अनुपस्थितीबद्दल शेतकऱ्यांमध्ये कुजबुज सुरू होती. वाचा सविस्तर बातमी…

मराठा आरक्षण रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधातील फेरविचार याचिकेवर निकाल आल्यानंतरच मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोपविण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयात गेले काही महिने प्रलंबित असून त्यावर लवकर सुनावणीसाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून नवीन सांख्यिकी व कायदेशीर तपशीलही सादर करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.