Prakash Ambedkar on Farmers: महायुती सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी दिले होते. पण सत्ता स्थापन होताच राज्याचे अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार मात्र मी कधीच कर्जमाफी देईल, असे कधी बोललोच नसल्याचे सांगितले. “माझ्या भाषणात तुम्ही कधी कर्जमाफीबद्दल ऐकले का?” असे विधान अजित पवार यांनी केले होते. या विधानावर बोलत असताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शेतकरीच मूर्ख असल्याचे संबोधले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रकाश आंबेडकर नेमके काय म्हणाले?

अमरावती येथे पत्रकारांशी बोलत असताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, या सरकारने, आधीच्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी, व्याज माफीचे आश्वासने दिली होती. साता बारा कोरा करण्याची भाषा वापरली गेली. मी शेतकऱ्यांना मूर्ख यासाठी म्हणतो, कारण त्यांनी सत्तेवर पुन्हा कुणाला बसवले? मग आता पुन्हा रडत बसण्याचे कारण काय? शेतामध्ये जे पेरता तेच उगवते, तसेच कर्ज माफी करणार नाही, असे म्हणणारे सरकार तुम्ही निवडून दिले. ते आता कर्जमाफी देणार नसतील तर त्यात नवीन काय?

निसर्गाच्या नियमाच्या विरोधात जर शेतकरी वागणार असतील तर ते भोगावे लागणारच. शेतकऱ्यांनी या गोष्टीचा विचार केला पाहीजे. मी सत्य बोलल्यामुळे लोक मला शिव्या घालतील. त्याची मला अजिबात पर्वा नाही, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

एसटी भाडेवाड का केली? याचा खुलासा करावा

राज्य सरकारने एसटीच्या भाड्यात १५ टक्क्यांची भाडेवाड केली आहे. यावरही प्रकाश आंबडेकर यांनी आपले मत व्यक्त केले. आधीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एसटी नफ्यात आहे, असे म्हणत होते. मी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझी भेट झाली असताना मी त्यांना महिलांना ५० टक्के सूट दिल्याबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावर ते म्हणाले होते की, ही सूट दिल्यामुळे महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे. १५० कोटी दिवसाला तोट्यात जाणारी लाल परी महिन्याला ४० कोटी नफ्यात आली असल्याचे ते म्हणाले होते. मग विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एसटीच्या तिकीट दरात वाढ का करत आहेत? आम्ही कोणत्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवायचा? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.

एसटी हे सर्वसामान्यांच्या प्रवासाचे प्रमुख साधन आहे. जर १५ टक्के भाडेवाढ केली असेल तर ती का केली? याचा खुलासा करायला हवा, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच सर्वसामान्य लोकांनीच भाजपाला निवडून दिले, त्यामुळे या महिन्यात त्यांनी पेढे वाटावेत आणि एप्रिल महिन्यात रडण्याची तयारी ठेवावी, अशीही टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vba leader prakash ambedkar says farmers are fooles slams bjp for st fare hike kvg