मुंबई : अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जून २०२५ मध्ये छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागात आणि सप्टेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या काळात धाराशिव, छत्रपती संभाजीनगर व धुळे जिल्ह्यांत झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी ३६८ कोटी ८६ लाख ८५ हजार मदतीच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे.

अवकाळी, अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी छत्रपती संभाजीनगर विभागासाठी १४ कोटी ५४ लाख ६४ हजार रुपये. अमरावती विभागासाठी ८६ कोटी २३ लाख ३८ हजार रुपये आणि सप्टेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या काळात धाराशिव, छत्रपती संभाजीनगर व धुळे जिल्ह्यांत झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी २६८ कोटी ८ लाख ८३ हजार रुपये, अशा एकूण ३६८ कोटी ८६ लाख ८५ हजार रुपयांच्या मदत निधीला मंजुरी देण्यात आली आहे.

जून २०२५ मध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १७१ शेतकऱ्यांच्या ७२.३२ हेक्टरवरील पिके बाधित झाली होती, त्यासाठी १६.०१ लाख. हिंगोली जिल्ह्यातील ३ हजार २४७ शेतकऱ्यांच्या १६११.३७ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ३६०.४५ लाख. नांदेड जिल्ह्यातील ७ हजार ४९८ शेतकऱ्यांच्या ४७९०.७८ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी १०७६.१९ लाख आणि बीड जिल्ह्यातील १०३ शेतकऱ्यांच्या ११ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी १.९९ लाख रुपयांच्या निधीचा समावेश आहे.

अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यातील २ हजार २४० शेतकऱ्यांच्या १३१२.०२ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी २७५.७९ लाख, अकोला जिल्ह्यातील ६ हजार १३६ शेतकऱ्यांच्या ३७९०.३१ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ४०५.९० लाख, यवतमाळ जिल्ह्यातील १८६ शेतकऱ्यांच्या १३०.५० हेक्टर बाधित क्षेत्रासाठी २५.४५ लाख, बुलढाणा जिल्ह्यातील ९० हजार ३८३ शेतकऱ्यांच्या ८७३९०.०२ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ७४४५.०३ लाख आणि वाशिम जिल्ह्यातील ८ हजार ५२७ शेतकऱ्यांच्या ५१६२.२८ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ४७१.२१ लाख रुपयांच्या निधीचा समावेश आहे.

गतवर्षीच्या तीन लाख बाधित शेतकऱ्यांना दिलासा

सप्टेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या काळात धाराशिव जिल्ह्यातील ३ लाख २७ हजार ९३९ शेतकऱ्यांच्या १,८९,६१०.७० हेक्टर बाधित क्षेत्रासाठी २६,१४३.३८ लाख, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७ हजार ५४८ शेतकऱ्यांच्या ४,८९१.०५ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ६६५.४१ लाख तर धुळे जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांच्या चार हजार रुपयांच्या निधीचा समावेश आहे. या मदतीमुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

सरकार आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांप्रती राज्य सरकार अत्यंत संवेदनशील आहे. बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करून निधीला मंजुरी देण्यात आली आहे. राज्य सरकार शेती, शेतकरी आणि आपत्तीग्रस्तांच्या पाठिशी ठामपणे उभा आहे, असे मत मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव – पाटील यांनी व्यक्त केले.