मुंबई : नागपूरच्या श्रीमंत राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार लंडनहून आज (सोमवारी) मुंबईत दाखल होणार असून राज्य शासनातर्फे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सायंकाळी ही तलवार लोकार्पण करण्याचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. रघुजीराजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार राज्य शासनाने लिलावात जिंकली असून नुकतीच सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी लंडन येथे ही तलवार ताब्यात घेतली.
ही तलवार सोमवारी मुंबईत दाखल होईल. शेलार हे विमानतळ प्राधिकरणाकडून सकाळी १० वाजता ही ऐतिहासिक तलवार स्वीकारतील. त्यानंतर विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येईल. दरम्यान, मुंबईत पावसाचा जोर वाढल्याने आणि सकाळ पासून सर्वत्र वाहतूक कोंडी झाल्यामुळे मुंबई विमानतळावरुन श्रीमंत रघुजी राजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार आणताना काढण्यात येणारी बाईक रॅली रद्द करण्यात आली आहे. संध्याकाळी मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत होणारा कार्यक्रम नियमित वेळेत होईल.
प्रभादेवी येथील पु.ल. देशपांडे कला अकादमी तर्फे ‘ सेना साहेब सुभा पराक्रम दर्शन ’ सोहळा सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात श्रीमंत राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवार प्रदर्शनाचे उदघाटन व लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, शेलार यांच्यासह श्रीमंत राजे रघुजी भोसले यांचे वंशज श्रीमंत मुधोजी राजे भोसले उपस्थित राहणार आहेत.
श्रीमंत रघुजीराजे भोसले यांच्या तलवारीचा लिलाव घोषित झाल्याचे वृत्त राज्यात आल्यावर फडणवीस आणि शेलार यांनी तातडीने हालचाली केल्या. राज्य शासनामार्फत या लिलावामध्ये लंडनमधील एका मध्यस्थाने सहभाग घेतला आणि बोली जिंकली. त्यामुळे ही तलवार राज्य शासनाच्या ताब्यात आली आहे.
तलवारीचे प्रदर्शन
श्रीमंत रघुजीराजे भोसले यांच्या ब्रिटनहून आणलेल्या तलवारीचे व बारा जागतिक वारसा मानांकित गडकिल्ल्यांच्या माहितीचे प्रदर्शन १९ ते २५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत सकाळी ११ ते सायं ७ दरम्यान प्रभादेवीतील पुल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सर्वांनसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.
तलवारीचे ऐतिहासिक महत्त्व
रघुजी भोसले प्रथम (१६९५ ते १४ फेब्रुवारी १७५५) हे नागपूरकर भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्वाचे सरदार होते. रघुजी भोसले यांचे शौर्य आणि युद्धनीती यांवर प्रसन्न होवून छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना ‘सेनासाहिबसुभा’ ही पदवी दिली होती. रघुजी भोसले प्रथम यांनी १७४५ आणि १७५५ मध्ये बंगालच्या नवाबाविरुद्ध युद्धमोहिमांचे नेतृत्व करून मराठा साम्राज्याचा बंगाल, ओडिशापर्यंत विस्तार केला. याचबरोबर रघुजींनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये चांदा, छत्तीसगढ, संबळपूर याही प्रदेशांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. दक्षिण भारतातील कुड्डाप्पाचा नवाब, कर्नुलचा नवाब यांचाही पराभव करून दक्षिण भारतात आपला लष्करी आणि राजकीय दबदबा निर्माण केला. अठराव्या शतकातील एक अत्यंत धाडसी मराठा सेनानी म्हणून रघुजी भोसलेंकडे बघितले जाते. नागपूर भोसलेंच्या भौगोलिक सीमांमध्ये लोखंड, तांबे यांच्या खाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होत्या. यांचा वापर वस्तूंसोबतच शस्त्रे बनवण्यासाठीही केला जात असे. नागपूरकर भोसले घराण्यातील राजशस्त्रे निर्मिती आणि सौंदर्य यांचा अजोड मिलाफ आहेत.
रघुजीराजे भोसले यांची ही तलवार मराठा शैलीच्या ‘फिरंग’ पद्धतीच्या तलवारीचा उत्कृष्ट नमुना आहे. सरळ, एकधारी पाते आणि सोन्याचे नक्षीकाम केलेली मुल्हेरी घाटाची मूठ ही तलवारीची वैशिष्ट्ये आहेत. तलवारीचे पाते हे युरोपीय बनावटीचे असून पात्याच्या खजान्याजवळ पाते बनवणाऱ्या कंपनीचे नाव आहे. युरोपीय बनावटीची पाती ही मध्ययुगीन भारतातल्या उच्च वर्गांमध्ये प्रसिद्ध होती. पात्याच्या पाठीवर तळाशी ‘श्रीमंत रघोजी भोसले सेनासाहिबसुभा फिरंग’ हा देवनागरी लेख सोन्याच्या पाण्याने लिहिलेला आहे. पात्यावरील लेख ही तलवार रघुजी भोसले यांच्यासाठी बनवली गेली होती किंवा त्यांच्या वापरातील होती याकडे निर्देश करतो. तलवारीच्या मुल्हेरी मुठीवर सोन्याच्या पाण्याने कोफ्तगरी नक्षी काढलेली आहे. तलवारीच्या उभट मुसुमेला हिरव्या रंगाचे कापड गुंडाळलेले आहे.
बहुतांशी मध्ययुगीन मराठा शस्त्रांची कमी अथवा अजिबात नसलेले नक्षीकाम आणि शस्त्रांवरील निर्माणकर्त्याच्या किंवा वापरकर्त्याच्या नावाचा अभाव ही ठळक वैशिष्ट्ये होती. या दोन्हीसही अपवाद म्हणून रघुजी भोसले यांच्या तलवारीवर नावाचा लेख तसेच नक्षीकाम केलेले आहे. तलवारीचे युरोपीय बनावटीचे पाते अठराव्या शतकातील भारतातील आंतरराष्ट्रीय शस्त्रव्यापाराकडे निर्देश करते. नागपूरकर भोसलेंची १८१७ मध्ये सीताबर्डी येथे ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध लढाई झाली. या लढाईमध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा विजय झाल्यावर कंपनीने नागपूरकर भोसल्यांच्या खजिन्याची लूट केली. यामध्ये अनेक मौल्यवान वस्तू, दागिने तसेच शस्त्रांचाही समावेश होता. नागपूरचे संस्थान खालसा झाल्यावर ईस्ट इंडिया कंपनीला वेळोवेळी नजराणे आणि भेटीही मिळाल्या होत्या. रघुजी भोसलेंची तलवार युद्धानंतरच्या लुटीमध्ये अथवा ब्रिटिशांना दिलेल्या भेटींमध्ये देशाबाहेर गेली असण्याची शक्यता आहे.